
Team India Defeated South Korea: भारतीय पुरुष हॉकी संघाने आशिया कप 2025 चा अंतिम सामना जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 असा एकतर्फी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या शानदार विजयामुळे भारतीय संघाने केवळ आशियाई चॅम्पियन बनण्याचा मानच मिळवला नाही, तर पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी वर्ल्ड कप 2026 साठीही थेट पात्रता मिळवली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अपराजित राहून आपले वर्चस्व सिद्ध केले आणि अंतिम सामन्यातही त्यांनी कोरियाच्या अनुभवी संघाला विजयाची कोणतीही संधी दिली नाही.
भारतीय संघाची (Team India) या सामन्यात सुरुवात अतिशय धमाकेदार झाली. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर काही सेकंदातच भारताचा स्टार खेळाडू सुखजीत सिंग याने शानदार गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या सुरुवातीच्या धक्क्यातून दक्षिण कोरियाचा संघ सावरु शकला नाही आणि भारतीय खेळाडूंनी सामन्यावर आपली पकड मजबूत केली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला आणि बहुतांश वेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवला. त्यांना आणखी एक गोल करण्याची संधी मिळाली, पण जुगराज सिंगला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही.
दरम्यान, दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचा दबदबा कायम राहिला. सामन्याच्या 27व्या मिनिटाला दिलप्रीत सिंग याने अप्रतिम गोल करुन भारताची आघाडी 2-0 अशी दुप्पट केली. या गोलमुळे भारतीय संघात एक नवी ऊर्जा संचारली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. या गोलनंतरही भारताने आक्रमक खेळ सुरुच ठेवला, ज्यामुळे कोरियाचा संघ पूर्णपणे बचावात्मक झाला. कोरियानेही काही वेळा गोल करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही.
सामन्यातील तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारतीय खेळाडू संजयला ग्रीन कार्ड मिळाल्यामुळे भारतीय संघ काही काळासाठी 10 खेळाडूंसह खेळला. पण याचा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही. याच क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटाला पुन्हा एकदा दिलप्रीत सिंग याने गोल करत भारताची आघाडी 3-0 अशी मजबूत केली. हा सामन्यातील त्याचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा गोल ठरला, ज्यामुळे भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता.
चौथ्या क्वार्टरमध्येही भारताचे (India) वर्चस्व कायम राहिले. सामन्याच्या 49व्या मिनिटाला अमित रोहिदास याने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करत भारताला 4-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर कोरियाचा संघ पूर्णपणे थकलेला आणि निराश दिसत होता. सामन्याच्या 50व्या मिनिटाला त्यांच्यासाठी एकमात्र गोल सोन दियान याने केला. अखेर, भारतीय संघाने हा सामना 4-1 अशा मोठ्या फरकाने जिंकत विजयाचा गुलाल उधळला.
त्याचवेळी, या विजयामुळे भारतीय हॉकी संघाने एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला. भारतीय संघाने चौथ्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले. याआधी भारताने 2003, 2007 आणि 2017 मध्ये हा किताब जिंकला होता. आता 4 वेळा विजेतेपद पटकावून भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मागे टाकले. पाकिस्तानने 1982, 1985 आणि 1989 असे तीन वेळाच हॉकी आशिया कपचे विजेतेपद जिंकले होते. या विजयामुळे भारतीय हॉकी संघाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे संकेत मिळत आहेत.
आशिया कप जिंकल्यामुळे भारतीय संघाने थेट हॉकी वर्ल्ड कप 2026 साठी पात्र ठरला. या विजयामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढले आहे आणि वर्ल्ड कपमध्ये ते दमदार कामगिरी करतील अशी आशा आता निर्माण झाली आहे. भारतीय संघाच्या या विजयाचे श्रेय खेळाडूंच्या कठोर मेहनतीला आणि त्यांच्या कुशल प्रशिक्षणाला जाते. या विजयाने पुन्हा एकदा भारतीय हॉकीचे सुवर्णयुग परत येत असल्याची चाहत्यांमध्ये भावना निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.