
Indian Hockey Team Beet Kazakhstan: भारतीय हॉकी संघाने आशिया चषकात आपला विजयी सिलसिला कायम ठेवला आहे. सलग तिसरा सामना जिंकून भारताने विजयाची हॅटट्रिक साधली. या वेळी भारतासमोर कझाकिस्तानचा संघ होता, ज्याच्याविरुद्ध भारतीय खेळाडूंनी गोलवर गोल करत एकतर्फी विजय मिळवला. विशेष म्हणजे, या सामन्यात कझाकिस्तानचा संघ एकही गोल करु शकला नाही, तर भारताने तब्बल 15 गोल नोंदवले. या मोठ्या विजयासह भारताने आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये आपले स्थान निश्चित केले.
दरम्यान, हॉकी (Hockey) आशिया चषकात भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात चीनला 4-3 ने नमवून आपले इरादे स्पष्ट केले होते. हा सामना खूप चुरशीचा झाला होता, ज्यात अखेरच्या क्षणी भारताने बाजी मारली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताचा मुकाबला जपानशी झाला. हा सामनाही भारताने 3-2 अशा फरकाने जिंकला. या दोन सामन्यांमधूनच भारतीय संघाचा फॉर्म स्पष्ट झाला होता. त्यामुळे भारत आणि कझाकिस्तान यांच्यातील सामना एकतर्फी होईल, अशी अपेक्षा होती आणि झालेही तसेच.
भारतीय खेळाडूंनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच कझाकिस्तानच्या संघावर पूर्ण वर्चस्व राखले. एकामागून एक गोलचा वर्षाव करत भारताने कझाकिस्तानच्या संघाला पूर्णपणे निष्प्रभ केले. भारतीय संघाने एकूण 15 गोल केले, तर कझाकिस्तानचा संघ शून्य गोलांवरच समाधान मानण्यास भाग पडला. सामन्यादरम्यान कझाकिस्तानला काही संधी मिळाल्या, पण ते संधीचे गोलमध्ये रुपांतर करु शकले नाहीत.
सुपर 4 मध्ये प्रवेश करणाऱ्या चार संघांमध्ये भारताच्या (India) ग्रुपमधून (अ) भारत आणि चीन यांनी स्थान मिळवले आहे. भारताने तीन विजयांसह एकूण 9 गुण मिळवले आहेत, तर चीनकडे 4 गुण आहेत. दुसऱ्या ग्रुपमधून (ब) मलेशिया आणि कोरिया सुपर 4 मध्ये पोहोचले आहेत. मलेशियाने आपले सर्व सामने जिंकून 9 गुण मिळवले आहेत, तर कोरियाकडे 6 गुण आहेत. सुपर 4 मध्ये हे चारही संघ एकमेकांसोबत प्रत्येकी एक-एक सामना खेळतील. त्यानंतर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेले दोन संघ अंतिम सामन्यात (फायनल) जातील. त्यामुळे भारताला आता चीनसोबतच मलेशिया आणि कोरियाचाही सामना करावा लागेल.
दरम्यान, या सामन्यात भारताच्या तीन खेळाडूंनी गोलची हॅटट्रिक साधली. अभिषेकने सर्वाधिक चार गोल केले. त्याने 5व्या, 8व्या, 20व्या आणि 59व्या मिनिटाला गोल केले. सुखजीत सिंगने 15व्या, 32व्या आणि 38व्या मिनिटाला तीन गोल केले. जुगराज सिंगनेही 24व्या, 31व्या आणि 47व्या मिनिटाला गोल करुन आपली हॅटट्रिक पूर्ण केली. याशिवाय, कर्णधार हरमनप्रीत सिंग (26व्या मिनिट), अमित रोहिदास (29व्या मिनिट), राजिंदर सिंग (32व्या मिनिट), संजय सिंग (54व्या मिनिट) आणि दिलप्रीत सिंग (55व्या मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये तीन गोल केले, तर दुसऱ्या क्वार्टरमध्ये चार गोल करत मध्यांतरापर्यंत 7-0 अशी मोठी आघाडी घेतली. अभिषेकने तर दुसऱ्या क्वार्टरच्या पाचव्या मिनिटातच आपली हॅटट्रिक पूर्ण केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.