

Chronic Kidney Disease India: संपूर्ण जगात 'क्रॉनिक किडनी डिसीज' म्हणजेच दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या विकारांची (किडनी रोग) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. या विकाराने पीडित लोकांच्या संख्येत चीननंतर भारताने जगात दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित 'द लॅन्सेट' (The Lancet) या नियतकालिकातील एका नवीन अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या अहवालानुसार, भारतात सध्या सुमारे 13.8 कोटी लोक किडनीच्या विकारांनी त्रस्त आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात किडनी विकारांच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (Health Metrics and Evaluation) आणि ब्रिटनमधील अनेक संस्थांनी एकत्र येऊन हा अभ्यास केला आहे. या अभ्यासातील प्रमुख बाबी खालीलप्रमाणे आहेत. किडनी विकारांच्या रुग्णांच्या संख्येत चीन पहिल्या स्थानी आहे, जिथे अंदाजे 15.2 कोटी लोक या आजाराने पीडित आहेत. त्यानंतर 13.8 कोटी रुग्णांसह भारत (India) दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अभ्यासानुसार, किडनी विकारांमुळे जगभरात दरवर्षी सुमारे 15 लाख लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा या रोगाची भीषणता दर्शवतो. गेल्या काही वर्षांत भारतात किडनी विकारांची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, जी देशाच्या आरोग्य व्यवस्थेसाठी मोठी चिंता निर्माण करणारी बाब आहे.
अभ्यासकांनी किडनी विकारांच्या वाढीमागील मुख्य कारणे स्पष्ट केली आहेत. यामागे जीवनशैलीशी संबंधित आजार प्रामुख्याने कारणीभूत आहेत. या दोन गंभीर आजारांमुळे शरीरातील यूरिक ॲसिड आणि विषारी घटक (Toxins) यांचे प्रमाण वाढते. यामुळे हळूहळू मूत्रपिंड बिघडते. मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना किडनी रोग होण्याचा धोका खूप जास्त असतो. या अभ्यासामध्ये हृदयविकारांमुळे देखील किडनी रोग होऊ शकतो, हे स्पष्ट केले आहे.
भारतीय आरोग्य तज्ज्ञांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भारतात वाढता स्थूलपणा (Obesity), ताण (Stress) आणि मधुमेह यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळे किडनीच्या समस्या अधिक गंभीर होत आहेत. ग्रामीण आणि गरीब वर्गामध्ये या रोगाबद्दल सुरुवातीला तपासणी (Early Diagnosis) करण्याची जाणीव कमी आहे. त्यामुळे अनेक रुग्ण स्थिती गंभीर झाल्यावरच उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचतात. परिणामी, उपचारांवर होणारा खर्च आणि यश मिळण्याचे प्रमाण कमी होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने वर्षातून किमान एकदा किडनीची तपासणी करणे आवश्यक आहे.
किडनी निकामी होत असल्याची काही सुरुवातीची लक्षणे प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे.
लघवी करताना दुर्गंध (Smell) येणे, लघवीमध्ये फेस येणे (Froth) किंवा लघवीचा रंग गडद (Dark Colour) असणे.
रक्तदाब (BP) सतत जास्त राहणे, हे किडनी खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण आणि लक्षण दोन्ही आहे.
किडनीच्या विकारात डोळे आणि चेहरा सुजलेला (Puffy/Swollen) दिसू शकतो.
भारताने या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास, भविष्यकाळात आरोग्य व्यवस्थेवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.