
दसरा हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण आहे. याला विजयादशमी, असेही म्हणतात. हा सण आश्विन महिन्याच्या शुक्लपक्षातील दहाव्या दिवशी (नवरात्रीचा शेवटचा दिवस) साजरा केला जातो.दसरा हा सण चांगल्याचा वाईटावर विजय, सत्याचा असत्यावर विजय, सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय याचे प्रतीक आहे. दसऱ्याला साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानले जाते, त्यामुळे या दिवशी नवीन कामांची सुरुवात करणे, शस्त्र किंवा पुस्तके पूजणे, व्यवसायात नवा हिशेब सुरू करणे शुभ मानले जाते.
हिंदू धर्मात या सणाचे विशेष महत्त्व आहे. रामायणानुसार भगवान श्रीरामांनी याच दिवशी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली. त्यामुळे हा दिवस सत्याचा असत्यावर विजय म्हणून मानला जातो. काही परंपरेनुसार हा दिवस देवी दुर्गेच्या महिषासुरावरील विजयाचे प्रतीक मानला जातो. पांडवांनी वनवास काळात आपली शस्त्रे शमी वृक्षाजवळ लपवली होती
अज्ञातवास संपल्यावर त्यांनी विजयादशमीच्या दिवशी ती शस्त्रे परत काढून पूजली आणि युद्धासाठी सज्ज झाले. म्हणून या दिवशी शस्त्रपूजा किंवा आयुधपूजनाची प्रथा आहे. अनेक राजे व सरदार दसऱ्याला युद्धाची सुरुवात किंवा शस्त्रप्रदर्शन करीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दसरा हा शस्त्रपूजन व नव्या मोहिमेच्या प्रारंभाचा दिवस मानला जात असे.
गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक व दक्षिण भारतात दसऱ्याच्या दिवशी आयुधपूजन केले जाते. राम-रावण युद्धात विजय मिळाल्यानंतर रामांनी लक्ष्मणाला सोन्यासमान शमीची पाने अर्पण केली आणि ती विजयोत्सवाची निशाणी ठरली. पौराणिक मतानुसार शमी वृक्षात देवता वास करतात. त्यामुळे दसऱ्याला शमीपूजन, सोनं वाटण्याची प्रथा रूढ झाली. सोनं (आपट्याची पाने) एकमेकांना देऊन ‘सोनं घे, सोनं, सोन्यासारखं रहा’ अशा शुभेच्छा दिल्या जातात.
उत्तर भारतात रामलीला व रावण दहनाची परंपरा आहे. यामध्ये रावण, मेघनाद व कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. बंगाल आणि पूर्व भारतात हा दिवस दुर्गापूजेचा विसर्जन दिन म्हणून साजरा केला जातो.
त्रेतायुगात रावणाने माता सीतेचे अपहरण केले.भगवान श्रीरामांनी हनुमान, सुग्रीव, वानरसेना यांच्या मदतीने लंकेवर चढाई केली. नवरात्रीत त्यांनी देवी दुर्गेची उपासना करून विजय मिळवला आणि आश्विन शुक्ल दशमीला रावणाचा वध केला.म्हणून हा दिवस रावण दहन व सत्याचा असत्यावर विजय म्हणून मानला जातो.
असुरराज महिषासुराने देवांना पराभूत करून त्रास दिला. तेव्हा देवी पार्वती, लक्ष्मी, सरस्वती यांच्या शक्ती एकवटून अद्भुत शक्तिरूप दुर्गा निर्माण झाली. देवीने नऊ दिवस महिषासुराशी प्रखर युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याचा वध केला. म्हणून नवरात्र संपून दसरा हा दिवस शक्तीचा विजय म्हणून साजरा केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.