

नवी दिल्ली: सोशल मीडियाच्या ताकदीने आज देशाच्या राजकीय पटलावर एक नवा इतिहास रचला आहे. भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी देशातील काही बेरोजगार तरुणांवर केलेल्या 'कॉकरोच' (झुरळ) या टिप्पणीचे रूपांतर आता एका मोठ्या आंदोलनात झाले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ सुरू झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षालाही (BJP) मागे टाकले आहे.
इन्स्टाग्रामवर या पक्षाच्या फॉलोअर्सची संख्या १०.३ दशलक्ष (१ कोटी ३ लाख) झाली आहे, तर भाजपचे ८.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या डिजिटल वादळाचा केंद्रबिंदू असलेला आणि 'आप'शी कनेक्शन असलेला ३० वर्षीय मराठी तरुण अभिजीत दीपके सध्या देशभरात चर्चेत आहे.
'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके हे मूळचे महाराष्ट्रातील असून त्यांचे वय अवघे ३० वर्षे आहे. ते एक व्यावसायिक 'पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रैटजिस्ट' (राजकीय संवाद रणनीतीकार) आहेत. त्यांनी पुणे येथून पत्रकारितेचे (जर्नलिझम) शिक्षण पूर्ण केले असून, सध्या ते अमेरिकेतील नामांकित 'बोस्टन युनिव्हर्सिटी'मधून पब्लिक रिलेशन्सचे (पीआर) उच्च शिक्षण घेत आहेत. डिजिटल मीडियावर नॅरेटिव्ह बिल्डिंग (कथा तयार करणे) आणि जनमत तयार करण्यात ते तज्ज्ञ मानले जातात.
अभिजीत दीपके यांचा राजकीय मोहिमांचा मोठा अनुभव आहे. २०२० ते २०२३ या काळात त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या (AAP) सोशल मीडिया आणि निवडणूक मोहिमा सांभाळल्या होत्या. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयामागे अभिजीत यांनी चालवलेल्या 'मीम-बेस्ड' (विनोदी आणि उपरोधिक) डिजिटल मोहिमेचा मोठा वाटा होता. या मोहिमेमुळे पक्षाला तरुण मतदारांना मोठ्या प्रमाणावर जोडता आले होते. हाच अनुभव त्यांनी आता 'CJP' साठी वापरला आहे.
या मोहिमेला केवळ सामान्य तरुणांचाच नव्हे, तर देशातील दिग्गज विचारवंत आणि विरोधी पक्षातील नेत्यांचाही पाठिंबा मिळत आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) आक्रमक खासदार महुआ मोइत्रा, माजी क्रिकेटपटू आणि नेते कीर्ती आझाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या मोहिमेचे उघडपणे समर्थन केले आहे. पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोक जोडले गेले असून पक्षाचे स्वतंत्र 'अँथम' (गीत) देखील रिलीज करण्यात आले आहे.
'आळशी आणि बेरोजगार तरुणांचा आवाज' अशी ओळख सांगणाऱ्या या पक्षाने सत्तेत आल्यास काय करणार, याचा रंजक जाहीरनामा दिला आहे:
निवृत्तीनंतर कोणत्याही सरन्यायाधीशाला राज्यसभेवर पाठवले जाणार नाही.
एकाही वैध मतदाराचे नाव यादीतून कट झाल्यास निवडणूक आयोगावर 'UAPA' अंतर्गत दहशतवादाची कारवाई होईल.
महिलांना थेट ५० टक्के आरक्षण दिले जाईल.
कॉर्पोरेट उद्योगपतींशी संबंधित मीडिया हाऊसचे लायसन्स रद्द केले जाईल.
पक्षांतर करणाऱ्या आमदार किंवा खासदाराला २० वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास आणि सार्वजनिक पद भोगण्यास बंदी घातली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.