
Battle of Longewala 1971
भारतीय वायूसेना (Indian Air Force) ही देशाच्या हवाई सीमांचे रक्षण करण्यासाठी नेहमी सज्ज राहणारी शक्ती आहे. तिचा इतिहास अनेक युद्धे, ऑपरेशन्स आणि शांतीधारक मोहिमांनी भरलेला आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील 'लोंगेवालाची लढाई' हे भारतीय हवाई दलाच्या अतुलनीय पराक्रमाचे एक ज्वलंत उदाहरण आहे, जिथे केवळ मुठभर सैनिकांचे धैर्य आणि हवाई दलाची अचूक कारवाई याने विजयाची गाथा लिहिली.
३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने अनेक भारतीय हवाई तळांवर हल्ला करून 'ऑपरेशन चंगेज खान' सुरू केले. याच दरम्यान, पश्चिमेकडील आघाडीवर पाकिस्तानने एक महत्त्वाकांक्षी भूमी आक्रमण सुरू केले. पाकिस्तानने सुमारे २००० सैनिक आणि ४५ रणगाडे (टँक) जैसलमेर सेक्टरमध्ये पाठवले. त्यांचा उद्देश अचानक हल्ला करून रामगड आणि जैसलमेर ताब्यात घेणे हा होता.
४ डिसेंबरची वेळ होती. २३ व्या पंजाबची 'अल्फा कंपनी' मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वाखाली लोंगेवाला चौकीवर तैनात होती. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त २० किलोमीटरवर होते. मेजर चांदपुरी यांच्या तुकडीकडे रिकॉइललेस (RCL) बंदूक, मशीन गन आणि मोर्टार यांसारखी मर्यादित शस्त्रे होती.
४ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर, गस्तीवरील सैनिकांना पाकिस्तानी रणगाड्यांच्या इंजिनांचा आवाज ऐकू आला. त्यानंतर लगेच मेजर चांदपुरी यांना कळवण्यात आले की पाकिस्तानी रणगाडे भारतीय हद्दीत घुसले आहेत आणि लोंगेवालाकडे पुढे जात आहेत. पहाटेपर्यंत, पाकिस्तानी रणगाड्यांनी चौकीवर गोळीबार सुरू केला. त्यांच्या अत्यंत मंद गतीमुळे (वाळूतून प्रवास करत असल्याने) भारतीय सैनिकांना आपली संरक्षणाची स्थिती मजबूत करण्यासाठी थोडा वेळ मिळाला.
मेजर चांदपुरी यांनी केवळ एका रिकॉइललेस गनच्या मदतीने एका पाकिस्तानी रणगाड्यावर गोळीबार केला. सुरुवातीला लक्ष्य चुकले असले तरी, पाकिस्तानी रणगाडे एका काटेरी तारांच्या कुंपणाजवळ थांबले, कारण त्यांना ते भूसुरुंग वाटले.
मेजर जनरल आर.एफ. खंबाटा यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यांना लगेचच हवाई दलाच्या मदतीची आवश्यकता जाणवली. पहाटे २ वाजता त्यांनी जैसलमेर हवाई तळाचे विंग कमांडर एम.एस. बावा यांच्याशी संपर्क साधला. जैसलमेर हवाई तळावर तैनात असलेले हंटर (Hunter) लढाऊ विमान रात्री उड्डाण करू शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी सकाळपर्यंत वाट पाहिली.
५ डिसेंबरच्या पहाटे, पाकिस्तानी रणगाडे लोंगेवाला चौकीवर पुढील हल्ला करण्याच्या तयारीत असताना, जैसलमेरहून उड्डाण करणारे भारतीय हंटर विमान त्यांच्यावर 'काळ बनून' कोसळले. स्क्वॉड्रन लीडर आर.एन. बाली यांच्या नेतृत्वाखाली स्क्वॉड्रन लीडर डीके दास आणि फ्लाइट लेफ्टनंट रमेश गोसाई या वैमानिकांनी हल्ला सुरू केला.
डीके दास यांच्या माहितीनूसार, खाली जमिनीवर शत्रूचे रणगाडे काळसर काड्यांसारखे दिसत होते. वैमानिकांनी प्रथम रॉकेट हल्ले केले आणि नंतर ३० मिमी एडीएम गनचा वापर केला. हल्ले टाळण्यासाठी पाकिस्तानी रणगाडे गोलाकार फिरू लागले, ज्यामुळे धूळ निर्माण झाली आणि वैमानिकांना लक्ष्य साधणे कठीण झाले. तरीही, भारतीय विमानांनी अत्यंत धैर्याने आणि अचूकतेने हल्ले सुरू ठेवले. दुपारपर्यंत, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी सैन्याचा कणा मोडून काढला.
लोंगेवालाची लढाई संध्याकाळपर्यंत संपुष्टात आली. या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा पराभव होण्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे, वाळवंटातील अत्यंत मंद प्रगती: पाकिस्तानी शेरमन आणि टी-५९ चिनी रणगाड्यांचे वाळवंटातील प्रवास अत्यंत धीमा होता.
अति उष्णतेमुळे अनेक पाकिस्तानी रणगाड्यांचे इंजिन निकामी झाले, ज्यामुळे ते निकामी होऊन मोकळ्या वाळवंटात थांबले. हवाई संरक्षणाचा अभाव: इतक्या मोठ्या भू-सैनिकी कारवाईसाठी पाकिस्तानकडे हवाई संरक्षणाची (Air Cover) कमतरता होती.
या युद्धात पाकिस्तानचे ४५ पैकी तब्बल ३६ रणगाडे नष्ट झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्याही देशाने एकाच लढाईत इतके रणगाडे गमावले नव्हते. भारतीय हवाई दलाच्या निर्णायक भूमिकेमुळे भूदलाच्या मर्यादित तुकडीला अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक विजय मिळवता आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.