
गोव्यात भाज्यांचे उत्पादन वाढायला हवे असे मला वाटते. मी गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक या भागातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी फिरत असतो. त्या भागातील शेतकरी अधिक प्रगतिशील आहेत. त्यांच्या तुलनेत आम्ही अनेक बाबतीत कमी पडतो.
मात्र आमच्या बाबतीतली एक बेरजेची गोष्ट म्हणजे आमच्याकडे फलोत्पादन महामंडळ आहे, जे शेतकऱ्यांकडून हमीभावाने उत्पादन विकत घेते. ही सुविधा देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांपाशी नाही. बेळगावातील भाजीचा भाव वाढल्यास गोव्यातील शेतकऱ्यांनादेखील भाव वाढून मिळतो आणि भाव उतरल्यास जो हमीभाव आहे त्या भावाने सरकार त्यांचे उत्पादन विकत घेते.
त्यामुळे शेतीत पिकवलेले उत्पन्न वाया जाईल किंवा त्याला कमी भाव मिळेल याची चिंता करण्याची आवश्यकता गोव्यातील शेतकऱ्यांना नाही. त्याचा परिणाम म्हणून गेली तीन वर्ष गोव्यातील भाज्यांचे उत्पादन वाढलेले आपण पाहतो आहोत. अद्यावत तंत्रज्ञान आणि पद्धतशीर रोपण याकडे लक्ष दिल्यास शेतीत चांगले उत्पादन मिळू शकते याच शंका नाही. कुठले विशिष्ट पीक, कुठल्या काळात घ्यावे याचा अंदाज शेतकऱ्याला असायला हवा.
सर्वसाधारण गोमंतकीय शेतकरी भेंडी, काकडी, कोबी, गाजर, कलिंगड, अळसांदे यांचे पीक आपल्या शेतातून घेत असतो. शेतकऱ्याने बाजाराचा (मागणी) तसेच वातावरणाचा अभ्यास करून आपल्या शेतात भाज्यांची लागवड करायला हवी. उदाहरणार्थ, आता हिवाळा सुरू होणार आहे.
या मोसमात कोबी, कलिंगड, अळसांदे, मुळा, तांबडी भाजी यांचे पिक शेतातून घेता येते. आपल्या शेतात उगवलेल्या भाज्या बाजारात लवकर कोमेजतात कारण त्यांच्यासाठी रसायनिक खते वापरलेली नसतात. मात्र परगावातून आलेली भाजी खूप दिवस ताजी दिसते कारण त्यात भरमसाठ रसायनिक खते वापरली गेलेली असतात. आपण हे मुद्दाम लक्षात घेतले पाहिजे. याचा अर्थ आम्ही सेंद्रिय खतेच फक्त वापरतो असे नाही मात्र त्याचे प्रमाण फार अल्प आहे हे मी नमूद करू इच्छितो.
आजच्या काळात शेती फायदेशीर राहिलेली नाही असा सूर अनेकदा ऐकू येतो. सुपारी, नारळ यांचे उत्पादन काही कारणांमुळे कमी झालेले आहे ही वस्तुस्थिती आहे मात्र भाज्यांच्या उत्पादनाला खूप वाव आहे हे मी नक्की सांगू शकतो. एक एकराच्या जागेत पद्धतशीर शेती केल्यास एक कुटुंब आपला व्यावस्थित निर्वाह करू शकते. पाच ते सहा लाखांची उलाढाल या जागेत होऊ शकते. अर्थात, यातील निव्वळ नफा तुम्ही कुठल्या प्रकारे काम करता त्यावर अवलंबून असेल.
गोव्यात ज्या पडीक जमिनी आहेत त्यात शेती पुन्हा सुरू व्हायला हवी. त्यासाठी जे मार्गदर्शन लागेल ते आज सरकार तसेच खाजगी स्त्रोतांमार्फत आज मिळू शकते. आज स्थिती अशी आहे की काही लोक कष्टांना तसेच शेतीतील अनिश्चिततेला घाबरून शेतीपासून दूर राहणे पसंत करतात तर काही लोक योग्य मार्गदर्शनाअभावी शेतीपासून दूर राहतात. या लोकांनी आपली जमीन पडीक न ठेवता योग्य मार्गदर्शनाची कास धरणे खूप महत्त्वाचे आहे इतकेच मी सांगू इच्छितो.
वरद सामंत
प्रगतीशील शेतकरी/कृषी राजदूत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.