
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील या हाय-व्होल्टेज फायनलपूर्वी भारतीय शिबिरातून दुखापतींच्या बातम्या समोर आल्या आहेत. संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या, सलामीवीर अभिषेक शर्मा आणि तरुण फलंदाज तिलक वर्मा यांच्या फिटनेसबाबत अनिश्चितता कायम आहे.
भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, हार्दिक पंड्या आणि अभिषेक शर्मा या दोघांनाही सामन्यादरम्यान क्रॅम्प्सचा त्रास झाला.
मॉर्केल म्हणाले, "हार्दिक आणि अभिषेकला सामन्यात क्रॅम्प्स आले होते. हार्दिकची आज रात्री आणि उद्या सकाळी तपासणी केली जाईल, त्यानंतरच त्याच्या खेळण्याबाबत निर्णय होईल. अभिषेकची प्रकृती स्थिर आहे."
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने पहिले षटक टाकल्यानंतर लगेचच मैदान सोडले. चाहत्यांना तो पुन्हा मैदानात परतेल अशी अपेक्षा होती, पण तो परतला नाही. दुसरीकडे, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला अभिषेक शर्मा दहाव्या षटकात फलंदाजीदरम्यान क्रॅम्प्समुळे मैदानाबाहेर गेला. त्यावेळीही स्टेडियममधील चाहत्यांना मोठा धक्का बसला.
तिलक वर्माची परिस्थिती वेगळी आहे. त्याला क्रॅम्प्सचा त्रास नव्हता, पण सीमारेषेजवळ शानदार फिल्डिंग करताना तो जखमी झाला. भारताच्या गोलंदाजीच्या १८ व्या षटकात दासुन शनाकाने मिड-विकेटवर षटकार मारला. तिलक वर्माने उडी मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तो अयशस्वी ठरला आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याच्या अंतिम सामन्यातील सहभागाबाबत शंका उपस्थित झाली आहे.
भारत आणि पाकिस्तानची फायनल ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी मानली जाते. दोन्ही संघांचा अंतिम फेरीतील हा पहिलाच आमनेसामना असल्याने उत्सुकता दुप्पट झाली आहे. परंतु भारताच्या तीन प्रमुख खेळाडूंच्या फिटनेसविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने संघ व्यवस्थापन मोठ्या तणावाखाली आहे.
भारतीय संघाकडे बेंच स्ट्रेंथ असूनही, हार्दिकसारखा अष्टपैलू खेळाडू, अभिषेकसारखा आक्रमक सलामीवीर आणि तिलकसारखा तरुण दमदार फलंदाज एकाच वेळी अनुपस्थित राहण्याची शक्यता संघासाठी मोठा धक्का ठरू शकतो.
आता सर्वांचे लक्ष भारतीय संघ व्यवस्थापनाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे. हे तीन खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात उतरतात का, की टीम इंडिया नवे पर्याय शोधते, याचा खुलासा पुढील २४ तासांत होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.