

Andhra Pradesh Father Kills Daughters: आंध्र प्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यातून एक अत्यंत अंगावर काटा आणणारी आणि मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक घटना समोर आली. येथील चिमाकुर्ती मंडळातील केव्ही अग्रहारम गावामध्ये एका पित्याने आपल्या तीन सख्ख्या निष्पाप मुलींची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली. अच्युत (वय 11), पूजिता (वय 9) आणि लोहिता (वय 8) अशी मृत दुर्दैवी मुलींची नावे आहेत.
प्राथमिक तपासामध्ये पोलिसांनी (Police) कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून हे भयंकर पाऊल उचलले गेल्याचा संशय व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पिता सुधाकर हा एका ग्रॅनाइट खाणीमध्ये बस चालक म्हणून काम करत होता. सुधाकर आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून सतत मोठे वाद होत होते. याच घरगुती भांडणांना कंटाळून त्याची पत्नी आपल्या तीन मुलींना आणि पतीला सोडून माहेरी निघून गेली होती. पत्नी सोडून गेल्यानंतर सुधाकर हा आपल्या वृद्ध आईसोबत राहत होता आणि आपल्या तिन्ही मुलींचा सांभाळ करत होता. पत्नी परत येण्यास तयार नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत होता. त्याने अनेकवेळा पत्नीची समजूत काढून तिला परत आणण्याचे प्रयत्न केले, मात्र त्याला त्यात यश आले नाही. या नैराश्यातूनच त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
घटनेच्या दिवशी सकाळी सुधाकर याने आपल्या आईला सांगितले की, तिन्ही मुली अजून झोपल्या आहेत, त्यामुळे त्यांना उठवण्याची गरज नाही. त्यानंतर तो मुलांसाठी नाश्ता आणतो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, काही वेळाने सुधाकर गावाबाहेर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक माहिती गावकऱ्यांना मिळाली. यानंतर जेव्हा कुटुंबातील लोकांनी घरात जाऊन पाहिले, तेव्हा तिन्ही निष्पाप मुली अंथरुणावर मृत अवस्थेत पडल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे मुलींच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा नव्हत्या. त्यामुळे सुधाकर याने मुलींना खाण्यातून विष देऊन किंवा त्यांचा गळा दाबून त्यांना संपवले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
या मन सुन्न करणाऱ्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मुलींच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकाच वेळी चार जणांचा अशा प्रकारे करुण अंत झाल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, लहान मुलांचा काय दोष होता, असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.