पणजी: गोवामुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली; परंतु त्यांची नावे देखील आम्हाला आज माहीत नाहीत, ही शोकांतिका आहे. मुक्त गोव्यात ज्यांचे सरकार आहे, त्यांनी जाणीव ठेवून, हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकांचे धडे पाठ्यपुस्तकात असणे गरजेचे असल्याचे मत प्रा. प्रजल साखरदांडे यांनी व्यक्त केले.
ते गोमन्तक टीव्हीवरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या सडेतोड नायक कार्यक्रमात बोलत होते. प्रा. साखरदांडे पुढे म्हणाले, गोवा मुक्तीसाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली, त्यांच्यामुळे गोव्याची अस्मिता, संस्कृती राखली गेली. ती आज धोक्यात आहे. आज अनेक परप्रांतीय गोव्यात येत आहेत. डोंगर कापून तेथे दिल्लीवाले घरे बांधून आहेत आणि मूळ गोमंतकीय इतर देशांत स्थलांतरित होत आहेत. हे सारे चिंताजनक आहे, असेही साखरदांडे म्हणाले.
गोवा मुक्त करण्यात तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांचे योगदान आहे; परंतु पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना दोष देणे देखील चुकीचे आहे. तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने अनेक गोष्टी घडल्या. गोव्यातही अशा विचारांचे लोक होते. काहींना गोवा मुक्त व्हावा व तो स्वतंत्र असावा;
भारत किंवा इतर कोणत्याही देशात त्याने सामील होऊ नये, असे वाटत होते. काहींना पोर्तुगीज राजवट कायम हवी होती. तर बहुसंख्य लोक गोवा मुक्त होऊन तो भारतात विलीन व्हावा या मताचे होते, ही देखील तत्कालीन स्थिती होती. त्यामुळे इतिहासाच्या अनुषंगाने इतिहासकारांना देखील तटस्थपणे इतिहास मांडण्यात अपयश आले असल्याचे मत प्रा. साखरदांडे यांनी व्यक्त केले.
आजचा तरुण प्रामुख्याने कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संलग्न आहे. तरुण जे काही घडतेय त्याबाबत संवेदनशील आहेत; परंतु त्यांनी राज्यातील विविध मुद्यांबाबत रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करायला हवा, तो होत नसल्याचे मत प्रा. साखरदांडे यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.