चाकरमान्यासाठी यंदाचा शिमगोत्सव विशेष ठरणार आहे. होळीच्या सणाला गावी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी या कटकटीतून आता कोकणी माणसाची सुटका होणार आहे. राज्य सरकारने मुंबई ते विजयदुर्ग अशी थेट जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे यंदाचा 'शिमगा' अधिक सुखकर होणार आहे.
१ मार्च २०२६ पासून मुंबईतील 'भाऊचा धक्का' (माझगाव) ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक 'विजयदुर्ग' दरम्यान 'एम टू एम' फेरी सेवा अधिकृतपणे सुरू होत आहे. प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत यामुळे मोठी बचत होणार आहे.
रस्ते मार्गे विजयदुर्गला पोहोचण्यासाठी १० ते १२ तास लागतात, मात्र या फेरी सेवेमुळे हे अंतर अवघ्या ७ तासांत पार करता येणार आहे. या उपक्रमाची माहिती देताना आमदार नितेश राणे यांनी आनंद व्यक्त केला असून, १ मार्च रोजी होणाऱ्या या बोटीच्या पहिल्या प्रवासात ते स्वतः चाकरमान्यांसोबत प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिमगोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी असते. एसटी आणि खासगी बसचे दरही या काळात गगनाला भिडलेले असतात. अशा परिस्थितीत, जलमार्गाचा हा पर्याय मध्यमवर्गीय चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
समुद्राच्या लाटांवर स्वार होत, निसर्गाचा आनंद घेत यंदा कोकणी माणूस आपल्या लाडक्या 'ग्रामदेवतेच्या' दर्शनासाठी सज्ज झाला आहे. या फेरी सेवेमुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी १ मार्च ते ८ मार्च दरम्यानचे विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे:
१ मार्च: मुंबई (सकाळी ८:००) ते विजयदुर्ग (दुपारी ३:००)
२ मार्च: विजयदुर्ग (दुपारी १२:००) ते मुंबई (संध्याकाळी ७:००)
४ मार्च: मुंबई (सकाळी ८:००) ते विजयदुर्ग (दुपारी ३:००)
५ मार्च: विजयदुर्ग (दुपारी १२:००) ते मुंबई (संध्याकाळी ७:००)
७ मार्च: मुंबई (सकाळी ८:००) ते विजयदुर्ग (दुपारी ३:००)
८ मार्च: विजयदुर्ग (दुपारी १२:००) ते मुंबई (संध्याकाळी ७:००)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.