Mumbai-Goa Highway: संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु असून या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राशी संबंधित एक महत्त्वपूर्ण मुद्दा पुन्हा चर्चेत आला. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे लोकसभा खासदार अरविंद सावंत यांनी प्रश्न विचारला. त्यांच्या प्रश्नाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले असून महामार्गाचे काम पूर्ण होण्याची नवीन मुदत जाहीर केली.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामातील दिरंगाईबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. सावंत म्हणाले, "गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ झाला, तरी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा महत्त्वाचा महामार्ग कधी पूर्ण होणार?" असा थेट प्रश्न त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विचारला. गणपती उत्सव असो वा इतर सुट्ट्या, या महामार्गावरील खड्डे आणि अर्धवट कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कोकणवासीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
सावंत यांच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करत महामार्गाचे काम पूर्ण करण्याची निश्चित तारीख जाहीर केली. गडकरी म्हणाले, "अरविंद सावंत यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत जो प्रश्न उपस्थित केला, तो अगदी बरोबर आहे. या महामार्गाचे काम 2009 मध्ये सुरु झाले. कामाला इतका विलंब का झाला, याची अनेक कारणे आहेत." गडकरींनी या विलंबामुळे निर्माण झालेल्या प्रमुख अडथळ्यांवर बोट ठेवले. ते म्हणाले, "या महामार्गाच्या कामात जमीन संपादनाची मोठी अडचण होती.
तसेच, काम पूर्ण न झाल्यामुळे आत्तापर्यंत अनेक कॉन्ट्रॅक्टर बदलण्यात आले. काम पूर्ण न होण्याची नेमकी काय कारणे आहेत, याबद्दल माहिती नाही, पण अनेकदा संबंधित कंत्राटदारांवर कारवाई सुद्धा करण्यात आली."
गडकरींनी सध्या सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. "सध्या या महामार्गाचे 89.29 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आम्ही गती देत आहोत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 2026 च्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होईल," अशी मोठी घोषणा त्यांनी लोकसभेत केली.
मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) हा केवळ दोन शहरांना जोडणारा रस्ता नाही, तर तो कोकण विभागाची लाईफलाईन मानला जातो. मुंबई आणि पुणे तसेच इतर भागातून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते गोवा प्रवासाचा वेळ 7 ते 8 तासांवर येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर कोकणातील पर्यटन, फलोत्पादन आणि मत्स्य व्यवसाय यांसारख्या उद्योगांना मोठा फायदा होईल, ज्यामुळे या भागाचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
गडकरींनी जाहीर केलेली 2026 ची मुदत ही कोकणवासीयांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे, पण नागरिकांना आता ही नवीन मुदत पाळली जाईल का, याची प्रतीक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.