Virat Kohli 
क्रीडा

Virat Kohli: 'ईश्वराचा आभारी की...' वाढदिवशी 49 वे शतक केल्यावर विराटने दिली पहिली प्रतिक्रिया

Pranali Kodre

Virat Kohli reacted on his 49th ODI Century on Birthday:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी (5 नोव्हेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सामना होत आहे. कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक करत मोठा विश्वविक्रम केला. विशेष म्हणजे विराट रविवारी त्याचा 35 वा वाढदिवसही साजरा करत आहे.

विराटने या सामन्यात 121 चेंडूत 10 चौकारांसह 101 धावांची नाबाद खेळी केली. विराटचे हे वनडे कारकिर्दीतील 49 वे वनडे शतक आहे. विराटने ही खेळी करता श्रेयस अय्यरबरोबरही महत्त्वपूर्ण 134 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 326 धावा केल्या.

दरम्यान, विराटने ही खेळी केल्यानंतर त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. विराट म्हणाला, 'या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण आहे. आम्हाला रोहित शर्मा आणि शुभमन गिलकडून चांगली सुरुवात मिळाली होती, माझे काम हा डाव पुढे नेणे इतकेच होते.'

'10 व्या षटकानंतर चेंडूला चांगले वळण मिळायला लागले होते. खेळपट्टी धीमी झाली आणि मग माझी भूमिका शेवटपर्यंत अन्य फलंदाजांबरोबर फलंदाजी करत राहणे, ही होती. हाच संदेश संघव्यवस्थापनाकडूनही माझ्यापर्यंत आला होता.

श्रेयसबरोबर झालेल्या भागीदारीबद्दल विराट म्हणाला, 'श्रेयस खूप चांगला खेळला आणि आम्हाला अखेरीच चांगल्या धावा मिळाल्या. आम्ही आशिया चषकावेळीही खूप चर्चा केली आहे. श्रेयस आणि मी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्यामुळे या भागीदारीने डाव पुढे नेण्याची गरज होती.'

'आमच्या संघात हार्दिक नाहीये, त्यामुळे आम्हाला माहित होते एखादी किंवा दोन विकेटही आम्हाला महागात पडू शकली असती. त्यामुळे आम्हाला शेवटपर्यंत फलंदाजी करायची होती.'

याबरोबरच 49 व्या शतकाबद्दल विराट म्हणाला, 'मी ईश्वराचा आभारी आहे की त्याने मला संघासाठी खेळण्यात आणि संघाच्या यशात योगदान देण्याची संधी दिली. माझ्या वाढदिवशी या ठिकाणी इतक्या जास्त संख्येने आलेल्या प्रेक्षकांसमोर शतक करणे शानदार होते.'

खेळपट्टीबद्दल विराट म्हणाला, 'खेळपट्टी धीमी आहे. आमच्याकडे चांगली गोलंदाजी फळी आहे, पण आम्हालाही मेहनत घ्यावी लागेल. विकेट्स घेणे ही यशाची किल्ली आहे. लवकर काही विकेट्स घेऊन त्यांना दबावात टाकणे महत्त्वाचे असेल.'

दरम्यान, या सामन्यात श्रेयस अय्यरने 87 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावांची खेळी केली. त्याचबरोबर रोहित शर्माने 24 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला 320 धावांचा टप्पा सहज पार करता आला.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी, मार्को यान्सिन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि ताब्राईज शम्सी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT