टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील २६ फेब्रुवारी रोजी झालेले दोन्ही सामने कमालीचे एकतर्फी ठरले. दुपारच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला, तर संध्याकाळच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला लोळवले. या दोन निकालांमुळे पॉइंट्स टेबलचे समीकरण पूर्णपणे बदलले असून स्पर्धेत आता कमालीची रंगत निर्माण झाली आहे. आता सर्वांच्या नजरा १ मार्च रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याकडे लागल्या आहेत, जो आता एका अर्थाने 'क्वार्टर फायनल' ठरणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवल्यानंतर एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा संघ ४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या विजयामुळे आफ्रिकेने उपांत्य फेरीतील (Semifinal) आपले स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे, पराभवानंतरही सरस नेट रन रेटच्या जोरावर वेस्ट इंडिजचा संघ सध्या दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. मात्र, त्यांचे आव्हान अद्याप संपुष्टात आलेले नाही.
भारतीय संघाने झिम्बाब्वेचा पराभव करून मौल्यवान गुण मिळवले असले, तरी रन रेटच्या गणितात भारत पिछाडीवर आहे. वेस्ट इंडिजचा नेट रन रेट भारतापेक्षा अधिक चांगला असल्याने टीम इंडिया सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, सलग दोन पराभवांमुळे झिम्बाब्वेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून ते सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आता भारताला पुढच्या फेरीत जाण्यासाठी वेस्ट इंडिजला नमवणे अनिवार्य आहे.
येत्या १ मार्चला होणारा भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे चाहत्यांसाठी हा सामना एखाद्या 'क्वार्टर फायनल'पेक्षा कमी नसेल. घरच्या मैदानावर भारतीय संघ आपला फॉर्म कायम राखून सेमीफायनल गाठणार की विंडीज संघ भारताचे स्वप्न मोडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.