नवी दिल्ली: कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची तळमळ आहे, त्याच वेळी एकदिवसीय प्रकार आपल्याला जवळचा वाटत नाही. परिणामी टी-२० प्रकारात आपण तरबेज झालो आहोत म्हणून हा प्रकार अधिक प्रिय आहे, असे मत टी-२० विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादव याने व्यक्त केले.
कट्टर मुंबईकर असलेल्या सूर्यकुमार यादवने पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये कसोटी क्रिकेटबाबतही प्रेम व्यक्त केले. देशासाठी अधिक कसोटी सामने खेळू शकलो नाही, याची खंतही त्याने व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपण एक कसोटी सामना खेळलो असल्याची आठवण त्याने काढली.
जे आपल्या नशिबात लिहिले आहे, तेवेढेच मिळणार आहे. क्रिकेटची सुरुवात मी रेड बॉलने केली. १०-१२ वर्षे रणजी क्रिकेट खेळलो, मुंबईत वाढलेलो असल्यामुळे रेड बॉलचे क्रिकेट अधिक प्रमाणात खेळलेलो आहे, मुळात सुरुवातच या चेंडूंनी झालेली आहे, असे सूर्यकुमार म्हणाला, परंतु व्हाइट बॉल चेंडूंवर खेळायला लागल्यानंतर फोकस बदलला, एकदिवसीय क्रिकेटही मी फार प्रमाणात खेळलो, पण तेथे चांगले यश मिळाले नाही, असेही सूर्यकुमारने सांगितले.
संधी देण्यात आली, तर कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा खेळायला आवडेल का, या प्रश्नावर कोणताही विचार न करता सूर्यकुमारने लगेचच सकारात्मक उत्तर दिले. २०१०-११ ते २०२० या १० वर्षांत मी रेड बॉल क्रिकेट खेळलो. मला हा प्रकार जवळचा आहे, अर्थातच कोणालाही संधी दिली, तर कसोटी क्रिकेट खेळायला सर्वांनाच आवडेल, असे सूर्यकुमार म्हणाला.
सूर्यकुमारची कितीही इच्छा आणि आवड असली तरी त्याला पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता फार कमी आहे. सध्या त्याचे वय ३५ वर्षे आहे. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरमध्ये त्याला संधी देण्यात आली होती. तेथे त्याला एका डावात केवळ आठ धावाच करता आल्या. त्याचप्रमाणे २०२३ मधील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघ अडचणीत असताना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु त्याला २८ चेंडूंत केवळ १८ धावाच करता आल्या होत्या. तो सामना भारताने गमावला. हातातोंडाशी आलेले विजेतेपदही हुकले आणि त्यानंतर सूर्यकुमार एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही.
टी-२० प्रकाराची वाढती लोकप्रियता, कसोटी क्रिकेटचा पारंपरिकपणा यामुळे या दोन प्रकाराचे महत्त्व कायम आहे, परंतु एकदिवसीय प्रकाराच्या भवितव्याबाबत विचारले असता सूर्यकुमारने सावध उत्तर दिले. या प्रकारात मी जेवढे खेळलो त्यानुसार यामध्ये तीन टप्प्यांत फलंदाजी करावी लागते. सुरुवातीला आक्रमक पवित्रा ठेवावा लागतो, पण समोरून विकेट गेल्यावर कसोटी सामन्यासारखी फलंदाजी करावी लागते. त्यानंतर अर्थातच अखेरच्या षटकांत पुन्हा पवित्रा बदलावा लागतो, असे मत सूर्यकुमारने मांडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.