अहमदाबाद: अति आक्रमक फलंदाजीचा अहंकार बाजूला ठेवा, समोर असलेल्या परिस्थितीचा आदर करा. टी-२० म्हणजे प्रत्येक चेंडूवर आक्रमण हे फाजील आत्मविश्वास बागळू नका, अशा शब्दांत महान फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय संघाचे कान उपटले आहेत.
टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी अहमदाबाद येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात भारतीय फलंदाजांनी घालीन लोटांगण केले आणि ७६ धावांच्या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव भारतीय फलंदाजांनी बेजबाबदार फटके मारून ओढावून घेतला त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
दक्षिण आफ्रिकेचीही सुरुवात खराब होती, परंतु डोवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिस मिलर यांनी जम बसवून कशी फलंदाजी करत मोठी भागीदारी केली, तोच पवित्रा आणि मानसिकता भारतीयांना बाळगायला हवी होती, असे गावसकर म्हणाले.
प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू अगोदर कशी फलंदाजी करून गेले याचेही भान भारतीय फलंदाजांना नव्हते. फाजील आत्मविश्वास बागळूनच ते मैदानावर येत होते.
बॅट हवेत फिरवत होते आणि विकेट बहाल करत होते. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात भारतीयांना चारीमुंड्या चीत केले, असा त्रागा गावसकर यांनी व्यक्त केला.
दक्षिण आफ्रिकेची तीन बाद २० अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मिलर आणि ब्रेविस यांनी ९७ धावांची भागीदारी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सात बाद १८७ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताचीही तीन बाद २६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर संपूर्ण डाव १८.५ षटकांत १११ धावांत संपुष्टात आला.
खेळपट्टी आणि परस्थितीचा आदर राखत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी कशी फलंदाजी केली यातून आपल्या फलंदाजांना बोधच घेतला नाही, ते आले आणि विकेट बहाल करून परतले. प्रत्येक चेंडू सीमापार धाडायचा असतो, हाच आवेश त्यांच्यात दिसून आला. अशा प्रकारे टी-२० प्रकारात खेळले जात नाही, असेही गावसकर यांनी सुनावले.
ईशान किशन (०), अभिषेक शर्मा (१५), तिलक वर्मा (१) हे पहिले तीन फलंदाज पॉवरप्लेमध्ये बाद झाल्यामुळे भारताची तीन बाद २६ अशी दारुण स्थिती झाली होती.
तिलक वर्मा हा हुशार फलंदाज वाटतो, परंतु त्याचाही या सामन्यातील पवित्रा मला आश्चर्यचकित करणारा होता. ईशान किशननेही हवेत फटका मारण्यापूर्वी थोडातरी विचार करायला हवा होता, असे गावसकर म्हणतात.
पॉवरप्लेमध्ये कमीत कमी ७० धावा करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु परिस्थिती आव्हानात्मक असेल, तर ५५ ते ६० धावाही कमी नसतात.
विकेट न गमावता एवढ्या धावा केल्या, तर पुढच्या फलंदाजांसाठी चांगली पायाभरणी असते, असे गावसकर म्हणाले.
भारताचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात तरी अक्षर पटेलला खेळवायला हवे. वॉशिंग्टन सुंदरच्या रूपाने ऑफस्पिनर खेळवण्याचा विचार करण्याची काहीही गरज नाही, कारण झिम्बाब्वेमध्ये तेवढे डावखुरे फलंदाज नाहीत, असे गावसकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.