Rohit Sharma
Rohit Sharma PTI
क्रीडा

SA vs IND: 'कान, डोळे उघडे ठेवा आणि...', रोहितने खेळपट्ट्यांच्या रेटिंगवरून ICC अन् सामनाधिकाऱ्यांना सुनावलं

Pranali Kodre

Rohit Sharma Reacted on Pitch rating after South Africa vs India Cape Town Test completed in 2 Days:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिका गुरुवारी (4 जानेवारी) संपली. केपटाऊनला झालेल्या कसोटी सामन्यात भारताने गुरुवारी अवघ्या दीड दिवसात ७ विकेट्सने विजय मिळवला. यासह मालिकेत 1-1 अशी बरोबरीही साधली. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने खेळपट्टीबाबत परखड प्रतिक्रिया दिली.

हा सामना अवघ्या 107 षटकांमध्ये उरकला. त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा पूर्ण झालेला सर्वात छोटा सामना ठरला. या सामन्यानंतर केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियममधील खेळपट्टीबाबत बरीच चर्चा सुरू झाली. या खेळपट्टीवर गोलंदाजांना मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. तसेच पहिल्याच दिवशी 23 विकेट्स पडल्या होत्या.

दरम्यान, रोहितला देखील खेळपट्टीबाबत सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्याने उत्तर देताना म्हटले की अशाप्रकराच्या खेळपट्ट्यांवर खेळण्यास समस्या नाही, पण मग भारतातील खेळपट्ट्यांवरही टीका करू नका.

रोहित म्हणाला, 'आपण सर्वांनीच या सामन्यात काय झाले, खेळपट्टी कशी होती वैगरे गोष्टी पाहिले. खरं सांगायचं तर मला अशा खेळपट्ट्यांवर खेळायला काहीच समस्या नाही. फक्त भारतात आल्यावरही सर्वांनी त्यांचे तोंड बंद ठेवावे आणि भारतीय खेळपट्ट्यांबाबत जास्त बोलू नये.'

'तुम्ही येथे स्वत:ला आव्हान देण्यासाठीच येता. हो, खेळपट्टी धोकादायक होती आणि आव्हानात्मकही. त्यामुळे जेव्हा संघ भारतात येतील, तेव्हा त्यांच्यासाठीही आव्हानात्मकच असणार आहे.'

'हे, पाहा जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेट खेळता, तेव्हा आपण कसोटी क्रिकेटबद्दल बोलतो की हे सर्वोत्तम आहे, कसोटी क्रिकेट सर्वोच्च आहे आणि बरंच, त्यामुळे मला वाटतं की त्यानुसार आपणही त्याच्या पाठीशी असायला हवं.'

रोहित पुढे म्हणाला, 'यासारखे आव्हान जेव्हा तुमच्या समोर असते, तेव्हा तुम्हाला त्याचा सामना करायचा असतो भारतातही तेच होते. मात्र, भारतात पहिल्याच दिवशी जर खेळपट्टीवर चेंडू फिरायला लागला, तर लोक लगेचच धुळ उडते म्हणायला सुरुवात करतात. इथेही खेळपट्टीला खूप तडे गेले होते, पण त्याकडे कोणी लक्ष दिले नाही.'

याशिवाय रोहितने आयसीसीच्या सामन्यांधिकाऱ्यांवरही निशाणा साधला. त्याने म्हटले की सामनाधिकाऱ्यांनीही खेळपट्टीला रेटिंग देताना थोडा विचार करायला हवा.

त्याने म्हटले की 'आपण कुठेही गेलो, तरी आपण तटस्थ राहिले पाहिजे, हे महत्त्वाचे आहे, विशेषत: सामनाधिकाऱ्यांनी. काही सामनाधिकाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून पाहायला पाहिजे की ते खेळपट्टीला कसे रेटिंग देत आहेत. हे महत्त्वाचे आहे.'

रोहितने वर्ल्डकप 2023 स्पर्धेमधील अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यातील खेळपट्टीला आयसीसीकडून सामान्य (Average) असे रेटिंग देण्यात आल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली.

तो म्हणाला, 'मला अजूनही विश्वास बसत नाहीये की वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी गुणवत्ता अशी रेटिंग दिली. एक खेळाडू (ट्रेविस हेड) तिथे शतक करतो, तर ती खेळपट्टी वाईट कशी ठरेल.'

'या अशा गोष्टी आहेत, ज्यावर आयसीसी आणि सामनाधिकाऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे आणि देश पाहून नाही, तर ते जी खेळपट्टी पाहातात, त्यावरून रेटिंग द्यायला हवे.'

'मला आशा आहे ते त्यांचे कान आणि डोळे उघडे ठेवून खेळाच्या या पैलूकडेही लक्ष देतील. खरंतर मी अशाप्रकारच्या सर्व खेळपट्ट्यांसाठी तयार आहे. आम्हाला अशा खेळपट्ट्यांवर खेळण्याचे आव्हान हवे आहे. आम्हाला अशा खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अभिमानही आहे, फक्त मला इतकंच म्हणायचंय की तटस्थ राहा.'

रोहितने असेही म्हटले की खेळपट्ट्यांना कशाप्रकारे रेटिंग दिले जाते, हे पाहायचे आहे. कारण मुंबई, बेंगलोर, केपटाऊन, सेंच्युरियन हे सर्व वेगळेगळी ठिकाणे आहेत, तेथील वातावरण वेगळे असते.

तो म्हणाला,'आपल्याला माहित आहे भारतातील परिस्थितीत फिरकी गोलंदाजीला मदत मिळणार आहे, यात काहीच शंका नाही. पण नक्कीच लोकांना ते आवडत नाही, कारण पहिल्या दिवसापासूनच चेंडू फिरतो. जर पहिल्या दिवसापासून चेंडू सीम होत असेल, तर ते सर्वांसाठी ठिक आहे, पण मग जर पहिल्या दिवसापासून चेंडू फिरत असेल, तरी तेही ठिक असायला हवे, असे माझे मत आहे.'

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाने कसोटी मालिकेत बरोबरी साधण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी 2010-11 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी मालिकेत भारताने बरोबरी साधली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT