नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारताने क्रिकेट या खेळामध्ये केलेल्या प्रगतीबाबत स्तुती करताना म्हटले की, भारतातील क्रिकेटमधील क्षमता, प्रतिभा मैदानात प्रत्यक्षात दिसू लागल्याचे समाधान व आनंद अधिक आहे. बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सी. के. नायडू. जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राहुल द्रविड बोलत होते.
भारतीय पुरुष संघाने २०२४ मध्ये टी-२० विश्वकरंडकाचे जेतेपद पटकावले. तसेच २०२६ मध्ये टी-२० विश्वकरंडकाचे जेतेपद राखण्यातही भारतीय पुरुष संघाला यश मिळाले. भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडकाला गवसणी घातली.
याच पार्श्वभूमीवर राहुल द्रविड यांनी आपले मत व्यक्त करताना पुरुष व महिला अशा दोन्ही विभागातील कामगिरीचे कौतुक केले. राहुल द्रविड पुढे सांगतात की, क्रिकेट या खेळामध्ये भारतातील प्रतिभा ही नेहमीच दिसून येत होती, पण आता ही प्रतिभा मैदानाबाहेरून प्रत्यक्षात मैदानात दिसून येत आहे. याचा आनंद काही औरच आहे.
राहुल द्रविड यांनी भारतातील क्रिकेट या खेळामधील प्रगतीचे श्रेय विविध बाबींना दिले. राहुल द्रविड यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले की, मागील तीन दशकांत भारताने क्रिकेटमध्ये मोठी झेप घेतली आहे. भारतात क्रिकेट या खेळासाठी अव्वल दर्जाचे व्यवस्थापन कार्यरत आहे.
अनुभवी प्रशिक्षकही आहेत. पायाभूत सुविधाही उत्तम आहेत. स्थानिक स्तरावर योग्य प्रकिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे ज्युनियर स्तरापासूनच एकापेक्षा एक असे दिग्गज क्रिकेटपटू तयार होताना दिसत आहेत. जगभरातील भारतीय क्रिकेटचे चाहतेदेखील खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. या सर्व बाबी एकत्र आल्यामुळे भारताला क्रिकेटमध्ये भव्यदिव्य यश मिळवता आले आहे.
राहुल द्रविड यांनी टी-२० विश्वकरंडक पटकावणाऱ्या भारतीय संघाचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारतीय संघ यंदा टी-२० विश्वकरंडक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता, पण जेतेपद राखण्याचे आव्हान मोठे होते. भारतीय संघाने सुरुवातीपासून छान खेळ केला. तसेच जेतेपद राखताना संस्मरणीय प्रदर्शन केले. कर्णधार सूर्यकुमार यादव व प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह संपूर्ण संघाची कामगिरी काबिल ए तारीफच ठरली आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वकरंडक जिंकणारा, रोहित शर्माच्या कर्णधारपदी चॅम्पियन्स करंडक जिंकणारा, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात महिला एकदिवसीय विश्वकरंडक पटकावणारा आणि आयुष म्हात्रेच्या यशस्वी कर्णधारपदी १९ वर्षांखालील विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या संघाचा वार्षिक सत्कार सोहळ्यात गौरव केला गेला. तसेच इतर दिग्गज माजी खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला. रॉजर बिन्नी, व मिताली राज यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यमान खेळाडूंमध्ये कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पॉली उम्रीगर पुरस्कार देण्यात आला, तर महिलांमध्ये हा मान स्मृती मानधनाला मिळाला आहे. स्मृती मानधना पाचव्यांदा या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
राहुल द्रविड यांनी सी. के. नायडू पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, माझ्या कारकिर्दीत मिळालेल्या अनेक संधींसाठी मी आभारी आहे. महान खेळाडूंसोबत मला खेळायला मिळाले याबाबत नशिबवान समजतो. निवृत्तीनंतरही प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहत आहे. क्रिकेट या खेळामध्ये महत्त्वपूर्ण संधी मला मिळाल्या. याचा आनंद मोठा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.