Team India | R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाचा तिसऱ्याच दिवशी डावाने दणक्यात विजय! अश्विनच्या फिरकीने उडवला वेस्ट इंडिजचा धुव्वा

Pranali Kodre

West Indies vs India, 1st Test, Result: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून पहिल्या सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी (14 जुलै) एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला आहे.

डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी पहिला डाव 5 बाद 421 धावांवर घोषित केला आणि 271 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव 50.3 षटकात 130 धावांवरच संपुष्टात आला. या सामन्यात आर अश्विनची गोलंदाजी महत्वाची ठरली.

तिसऱ्या दिवशी भारताने 113 व्या षटकापासून आणि 2 बाद 312 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यावेळी यशस्वी जयस्वाल 143 धावांवर आणि विराट कोहली 36 धावांवर नाबाद होता.

या दोघांनी सुरुवातही चांगली केली होती. पण जयस्वाल 171 धावांवर बाद झाला. त्याला अल्झारी जोसेफने बाद केले. 387 चेंडूत केलेल्या या खेळीत जयस्वालने 16 चौकार आणि 1 षटकार मारला. तो बाग झाल्यानंतर लगेचच केमार रोचने अजिंक्य रहाणेलाही 3 धावांवर बाद केले.

पण त्यानंतर रविंद्र जडेजाने अर्धशतक केलेल्या विराटला चांगली साथ दिली. पण विराट 76 धावा करून बाद झाला. त्याला राहकिम कॉर्नवॉलने बाद केले. त्यानंतर काहीवेळातच 152.2 षटकानंतर कर्णधार रोहित शर्माने 5 बाद 421 धावांवर भारताचा डाव घोषित केला. त्यामुळे भारताने 271 धावांची मोठी आघाडी घेतली.

भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मा यानेही शतकी खेळी केली. त्याने 103 धावांची खेळी केली.तो दुसऱ्या दिवशी जयस्वालबरोबर 229 धावांची विक्रमी सलामी भागीदारी केल्यानंतर बाद झाला होता.

भारताने पहिला डाव घोषित केल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरुवातीपासूनच गडगडली. 58 धावांवरच वेस्ट इंडिजने 5 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर नियमित कालांतराने वेस्ट इंडिजने विकेट्स गमावल्या.

वेस्ट इंडिजकडून पदार्पणवीर एलिक अथनाझने सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. तसेच जेसन होल्डरने 20 धावांची खेळी केली. अन्य कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजचा डाव 130 धावांवरच संपला आणि भारताने विजय मिळवला.

दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने शानदार गोलंदाजी करताना 21.3 षटकात 71 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, वेस्ट इंडिजचा पहिला डाव 64.3 षटकात 150 धावांवर संपुष्टात आला होता. वेस्ट इंडिजकडून एलिक अथानाझने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 20 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून या डावात कोणालाही 20 धावांचाही टप्पा गाठता आला नाही.

भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तसेच रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट् घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT