कोलकाता: मुंबईला जाण्याचे तिकीट कोण काढणार आणि घरी जाण्यासाठी कोण बॅगा भरणार, हे भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना ठरवणार आहे. सरस खेळ करून विजय मिळणारा संघ मुंबईला रवाना होईल तर पराभूत संघातील खेळाडू आपापल्या घरी जाण्याचा मार्ग पत्करतील. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात रविवारी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील लढत सुपर-८ मधील असली तरी तिला उपउपांत्य फेरीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.
वेस्ट इंडीज संघाशी निर्णायक टी-२० क्रिकेट सामन्यात लढणे म्हणजे समुद्रात राहून शार्क माशाशी वैर करण्यापेक्षा वेगळे नाही. भारतीय संघासमोर अत्यंत स्पष्ट ध्येय निर्माण झाले आहे ते म्हणजे सर्वोत्तम खेळ करून विंडीज संघाला पराभूत करायचे.
वेस्ट इंडीजसमोर कसोटी सामना किंवा एकदिवसीय सामन्यातील लढत असेल तर जास्त दडपण येत नाही. नमूद केलेल्या दोनही क्रिकेट प्रकारात भारतीय संघ विंडीजला आता पुरून उरतो; पण टी-२० क्रिकेटचा भाग वेगळा ठरतो.
बाकी खेळात डगमगणाऱ्या वेस्ट इंडीजला टी-२० क्रिकेट म्हटले की वेगळाच जोर चढतो. अगदी सहजी ते या क्रिकेट प्रकारात स्वत:ला व्यक्त करताना दिसतात.
रविवारी भारतीय संघासमोर आव्हान उभे करायला वेस्ट इंडीजकडे चांगला संघ आहे. फलंदाजीत कप्तान शेय होप, हेटमायर आणि रॉमन पॉवेलचा अनुभव आहे. गोलंदाजीत शमार जोसेफसारखा अत्यंत गुणवान तरुण वेगवान गोलंदाज आहे आणि सोबतीला जेसन होल्डरचे कौशल्य आहे.
संघाला खरी किनार दोन दर्जेदार डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने येते. मोती आणि अकील हुसेन चांगले तरबेज फिरकी गोलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा विंडीज संघाची ताकद वाढवतो.
भारतीय संघातील फलंदाजांनी झिम्बाब्वेसमोर खेळताना स्पर्धेत पहिल्यांदा आपली क्षमता सिद्ध केली. २५० धावांचा टप्पा ओलांडून क्षमतेची चुणूक दिली. तरीही भारतीय संघ व्यवस्थापन एकदम खूश नाही. फलंदाजांनी अजून सक्षम खेळ करून संघाला सुस्थितीत नेलेच पाहिजे, हा गौतम गंभीरची अपेक्षा आणि आग्रह आहे.
चेन्नईपेक्षा अजून चांगला खेळ भारतीय फलंदाजांनी करून दाखवला तरच रविवार सुखाचा जाणार आहे. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना अडचणीत आणायला फक्त षटकारांचा पाठपुरावा न करता चौकार आणि एकेरी धावांचा सपाटा फलंदाजांनी लावणे गरजेचे आहे.
सुरुवात चांगली झाली तर भारतीय संघ मोठा धावफलक उभारू शकतात, हे लक्षात घेता नजर अभिषेक शर्मा-संजू सॅमसन जोडीवर असणार आहे. तसेच गेल्या सामन्यात खेळलेल्या संघात बदल होण्याचे संकेत दिसत नाहीत.
क्षेत्ररक्षणात अजून भारतीय खेळाडूंनी कमाल करून दाखवलेली नाही. निर्णायक सामन्यात कोणता भारतीय खेळाडू कमाल झेल पकडून किंवा धावबाद करून संघाला वेगळी दिशा दाखवतो, हे बघायला लागेल.
गोलंदाजीत कसेही करून आखूड टप्प्याचा मारा न करण्याचे आव्हान आहे. आखूड टप्प्याच्या चेंडूवर विंडीजचे फलंदाज सहजी चौकार- षटकाराची भाषा बोलतात. गेल्या दोन सामन्यांत वरुण चक्रवर्तीचा गोलंदाजी करतानाचा टप्पा काहीसा आखूड राहिल्याने भरपूर धावा त्याने दिल्या. विंडीजसमोर ती चूक टाळावी लागेल.
बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली एका समारंभात भेटला असताना त्याने रविवारच्या सामन्यासाठी फलंदाजीला पोषक खेळपट्टी असायची ग्वाही दिली. कसोटी सामन्याच्यावेळी खेळपट्टीला कमी पाणी देण्याचा निर्णय चुकीचा ठरला होता. विंडीजसमोरच्या सामन्यात ती चूक टाळली गेल्याचे सौरवने सांगितले. चांगली खेळपट्टी आणि अति वेगवान बाहेरील मैदान म्हणजेच धावा भरपूर निघणार हे उघड आहे. सौरव गांगुलीच्या मते दोनपैकी कोणत्या संघातील गोलंदाज दडपणाखाली योग्य मारा करतात, यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.