महिला क्रिकेटमधील बहुप्रतिक्षित आशिया कप 2026 स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. दुबईच्या मैदानावर रंगणाऱ्या या स्पर्धेत आशियातील आठ महिला संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. भारतीय महिला संघासाठी ही स्पर्धा विशेष महत्त्वाची असून, आतापर्यंत सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. आता आठव्यांदा ट्रॉफी उंचावण्याचे लक्ष्य हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघासमोर असेल.
या स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेचा सामना अर्थातच भारत विरुद्ध पाकिस्तान हा असणार आहे. दोन्ही संघ एकाच गटात असल्याने क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.
महिला आशिया कप 2026 मध्ये सहभागी आठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, थायलंड आणि हाँगकाँग-चीन यांना ग्रुप एमध्ये स्थान देण्यात आले आहे. तर ग्रुप बीमध्ये बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका आणि यूएई हे संघ आहेत.
प्रत्येक संघाला साखळी फेरीत तीन सामने खेळावे लागतील. दोन्ही गटांमधून गुणतालिकेतील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करणे भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतीय महिला संघ आपल्या मोहिमेला 30 ऑगस्टला थायलंडविरुद्ध सुरुवात करणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. तुलनेने कमकुवत मानल्या जाणाऱ्या थायलंडविरुद्ध भारत विजय मिळवून स्पर्धेची सकारात्मक सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.
यानंतर भारतीय संघाचा सामना हाँगकाँग-चीनशी होणार आहे. हा सामना 3 सप्टेंबरला होईल. ग्रुप स्टेजमधील भारताचा तिसरा आणि सर्वाधिक चर्चेचा सामना पाकिस्तानविरुद्ध असणार आहे.
क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेला भारत-पाकिस्तान सामना 5 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम या सामन्याचे यजमानपद भूषवेल.
दोन्ही संघ एकाच गटात असल्यामुळे या सामन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताने सुरुवातीचे सामने जिंकले तर पाकिस्तानविरुद्धचा सामना गटातील अव्वल स्थानासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे मैदानावर दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
साखळी फेरीनंतर दोन्ही गटांतील सर्वोत्तम चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. स्पर्धेतील दोन उपांत्य सामने अनुक्रमे 10 आणि 11 सप्टेंबरला खेळवले जाणार आहेत. त्यानंतर विजेतेपदासाठी अंतिम सामना 13 सप्टेंबरला रंगणार आहे.
भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यास आठव्यांदा आशिया कप जिंकण्याची संधी भारतीय संघासमोर असेल.
भारतीय संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौरकडे आहे. स्मृती मंधाना उपकर्णधार म्हणून तिची साथ देणार आहे. फलंदाजीमध्ये शेफाली वर्मा, भारती फुलमाळी आणि प्रतिका रावल यांसारखे पर्याय आहेत.
गोलंदाजीमध्ये दीप्ती शर्मा, रेणुका ठाकूर, अरुंधती रेड्डी, राधा यादव आणि श्री चरणी यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. ऋचा घोष आणि जी कमलिनी या दोघी यष्टिरक्षक म्हणून संघाचा भाग आहेत. त्यामुळे फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंच्या बाबतीत भारताकडे चांगले संतुलन असल्याचे दिसते.
महिला आशिया कपच्या इतिहासात भारताचा दबदबा राहिला आहे. भारताने आतापर्यंत सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. सुरुवातीच्या आवृत्त्यांमध्ये वनडे स्वरूपात भारताने वर्चस्व गाजवले, तर नंतर टी-20 स्वरूपातही संघाने विजेतेपद पटकावले.
भारताने 2004, 2005-06, 2006 आणि 2008 मध्ये वनडे स्वरूपातील आशिया कप जिंकला. त्यानंतर 2012 आणि 2016 मध्ये टी-20 स्वरूपात पाकिस्तानचा पराभव करत भारताने विजेतेपद मिळवले. 2022 मध्येही भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून ट्रॉफीवर नाव कोरले.
महिला आशिया कप संपल्यानंतर भारतीय संघासमोर आणखी एक मोठे आव्हान असणार आहे. आशिया कपनंतर भारतीय महिला संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे आगामी स्पर्धेसाठी संघाची तयारी आणि खेळाडूंचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे.
सात वेळा आशिया कप जिंकलेल्या भारतीय संघाकडून यंदाही विजेतेपदाची अपेक्षा केली जात आहे. मात्र पाकिस्तानसह इतर आशियाई संघांकडून मिळणारे आव्हान लक्षात घेता भारताला प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.