Gautam Gambhir Defends Team India Defeat: टी20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद पटकावलेल्या टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर सलग दुसऱ्या पराभवाचा धक्का बसला. तिसऱ्या टी20 सामन्यात यजमान इंग्लंडसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले, ज्यामुळे टीम इंडियाला 125 धावांनी दारुण आणि अत्यंत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासोबतच भारताचे या मालिकेतील आव्हान संपुष्टात आले असून आता टीम इंडिया ही मालिका जिंकू शकत नाही, हे स्पष्ट झाले.
कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघाच्या कामगिरीवर आणि फलंदाजीच्या दुर्देशेवर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र, या मोठ्या पराभवानंतरही मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आपल्या खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून त्याने संघाचा बचाव केला.
सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संघाच्या या खराब कामगिरीचे तांत्रिक कारण स्पष्ट केले. गंभीर म्हणाला की, जेव्हा तुम्ही एखादा नवा संघ पुन्हा शून्यापासून उभा करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा अशा प्रकारची कामगिरी आणि चढ-उतार पाहायला मिळतात. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर सध्याच्या भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या नव्या रचनेत कर्णधारापासून ते सलामीच्या फलंदाजांपर्यंत सर्वच चेहरे बदलले आहेत. सध्याच्या संघात हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारखे अनुभवी मॅचविनर खेळाडू उपलब्ध नाहीत.
जेव्हा संघ अशा मोठ्या बदलांच्या टप्प्यातून जात असतो, तेव्हा अशा चुका स्वाभाविक आहेत. गंभीरने पुढे आठवण करुन दिली की, या संघात 15 वर्षांचा तरुण खेळाडू सलामीला येत आहे, तर प्रिन्स यादव आपला केवळ दुसराच आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळत होता. तसेच हर्षित राणा देखील दुखापतीतून नुकताच परतला, त्यामुळे या तरुण खेळाडूंना थोडा वेळ देणे गरजेचे आहे.
या सामन्यात भारताची (India) फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. इंग्लंडने दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया अवघ्या 76 धावांवर सर्वबाद झाली. वैभव सूर्यवंशी आणि इशान किशन यांनी संघासाठी सर्वाधिक वैयक्तिक 13 धावा केल्या. तर अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 10 धावांचे योगदान दिले. या चार फलंदाजांशिवाय संघातील एकही खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असून, आगामी सामन्यांमध्ये संघात काय सुधारणा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.