चेन्नई: यशापेक्षा अपयश जास्त काही शिकवून जाते. एका सामन्यातील अपयशानंतर भारतीय संघ ताळ्यावर आलेला आढळला. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सरावाला आलेल्या भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात दडपणाबरोबरीने ठाम निश्चय दिसू लागला. भारतीय क्रिकेट संघाची एका पराभवानंतर देहबोली बदललेली दिसली.
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत साखळी स्पर्धेच्या चारही सामन्यांत विजय मिळवूनही भारतीय संघाच्या मोहिमेत अपेक्षित हुरूप आला नव्हता. कारण त्यात नेहमीचा रुबाब नव्हता आणि सर्वोत्तम खेळ करत असल्याची ग्वाही नव्हती.
वरून भारतीय संघ व्यवस्थापन कितीही ऑल इज वेल सांगत होते तरी फलंदाजीतला अडखळता प्रवास कधी थांबणार, अशी चिंता डोकावत होती. सुपर-८ च्या पहिल्याच सामन्यात चिंता खरी ठरली आणि दक्षिण आफ्रिकेने वेगळी योजना यशस्वीपणे मैदानावर राबवून भारतीय संघाला मोठ्या फरकाने पराभूत केले.
आता उरलेल्या दोन सामन्यांत उतरण्याअगोदर लक्षणीय सुधारणा, योजना आखण्यात आणि त्या मैदानावर राबवणे क्रमप्राप्त झाल्याने प्रशिक्षक थोडा वेगळा विचार करू लागले आहेत, असे सरावात दिसले.
चेपॉकवरील सरावादरम्यान दोन प्रांतात भर दिसला. उंच उडालेले झेल पकडणे याचा वेगळा सराव होताना दिसला. सरावादरम्यान मैदानातील मोठे दिवे टाळून चेंडूवर नजर कशी ठेवायची यावर भर दिला जात होता. फलंदाज वेगवान गोलंदाजांनी संथ गतीने टाकलेल्या चेंडूंवर फलंदाज एक क्षण थांबून फटका कसा मारायचा याचा सराव करू लागले.
भारतीय संघासोबत असलेल्या दोन थ्रो डाऊन स्पेशालिस्ट लोकांनासुद्धा फक्त वेगाने मारा करू नका, असा संदेश दिला होता. स्थानिक खेळाडू जे भारतीय संघाच्या सरावात गोलंदाजी करायला आले होते, त्यांच्यातल्या वेगळ्या शैलीच्या गोलंदाजांना मारा करायची संधी मिळाली. फलंदाज हवेतून फटके मारायचा सराव करत होते तसाच जमिनीलगत ताकदीने फटके मारताना क्षेत्ररक्षकांच्या मधील जागेतून मारलेला चेंडू जातोय का हे तपासत होते.
चेपॉक मैदानावरील कर्मचारी सर्वोत्तम म्हणजे अगदी पाटा खेळपट्टी तयार करण्यात गुंतलेले दिसले. थंडीने चेन्नईला राम राम ठोकला असल्याने शहरामधील हवामान नेहमीप्रमाणे दमट आणि कडक उष्ण व्हायला लागले आहे. त्याच हवामानाचा फायदा कडक खेळपट्टी बनवण्यासाठी केला जात आहे.
सामना चालू झाल्यावर गोलंदाजांच्या बुटाच्या खिळ्यांनी खेळपट्टीवरील माती निघून जाईल इतकेच गवत राखले जात आहे. भरपूर पाणी आणि भरपूर रोलिंग खेळपट्टीवर करून मग ती थोडा वेळ वाळवायला उन्हात उघडी ठेवून लगेच आच्छादनाने झाकली जात होती.
मैदानावर आल्यावर कप्तान सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सितांशू कोटक यांनी खेळपट्टीची तपासणी करताना माळ्यांशी थोडी चर्चासुद्धा केली. सुपर-८ मधील असल्याने गुरुवारच्या सामन्याचे महत्त्व होतेच. रविवारच्या पराभवाने आता त्याचे मोल अजून वाढले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.