India vs Sri Lanka 600th Test Match Galle: टीम इंडिया दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाला असून, 15 ऑगस्टपासून गॉले येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि सुवर्ण अध्याय ठरणार आहे. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या सामन्यात पाऊल ठेवताच एक असा अभूतपूर्व पराक्रम करेल, जो आजवर जगातील केवळ दोनच देशांना साधता आला.
श्रीलंकाविरुद्धचा हा गॉले कसोटी सामना भारताचा 600 वा कसोटी सामना असणार आहे. या ऐतिहासिक टप्प्यासह भारत (India) जागतिक क्रिकेटमध्ये 600 कसोटी सामने खेळणारा जगातील तिसरा आणि आशिया खंडातील पहिलाच देश बनण्याचा बहुमान पटकावणार आहे.
विशेष म्हणजे भारताची ही ऐतिहासिक कामगिरी देशाच्या 79व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर घडणार असल्याने या सामन्याचे महत्त्व द्विगुणित झाले आहे. भारताने आपला पहिला अधिकृत कसोटी सामना 1932 मध्ये सी. के. नायडू यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध खेळला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु झालेला हा क्रिकेटचा प्रदीर्घ प्रवास 94 वर्षांनंतर 600व्या सामन्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रदीर्घ प्रवासात भारतीय क्रिकेटने अनेक महान कर्णधार, दिग्गज खेळाडू आणि अविस्मरणीय विजय पाहिले आहेत.
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत केवळ इंग्लंड (1097 सामने) आणि ऑस्ट्रेलिया (882 सामने) या दोनच संघांना 600 पेक्षा जास्त सामने खेळण्याचा अनुभव आहे. आता भारत या एलिट यादीत तिसऱ्या स्थानावर विराजमान होणार आहे.
आतापर्यंत खेळलेल्या 599 कसोटी सामन्यांच्या प्रवासात भारताने 186 सामने जिंकले आहेत, 188 सामन्यांत पराभव पत्करला आहे, 224 सामने अनिर्णित राहिले आहेत तर एक सामना टाय झाला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत खेळलेल्या 9 कसोटी सामन्यांपैकी 5 सामने जिंकून उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला गॉले येथे खेळल्या जाणाऱ्या या 600व्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात विजय मिळवून हा क्षण अधिक संस्मरणीय बनवण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न असेल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या सायकलचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे केवळ 600व्या सामन्याचा ऐतिहासिक विक्रम साजरा करणे एवढाच टीम इंडियाचा उद्देश नसेल, तर WTC च्या गुणतालिकेत मोलाचे गुण मिळवणे हेदेखील प्रमुख ध्येय असेल. शुभमन गिलच्या युवा ब्रिगेडचे मुख्य लक्ष्य श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत पराभूत करुन WTC फायनलच्या शर्यतीत आपले स्थान अधिक मजबूत करण्याचे असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.