१५ मे रोजी लखनौच्या इकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ७ गडी राखून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवामुळे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाचे प्लेऑफचे समीकरण कमालीचे बिघडले आहे. या सामन्यात लखनौच्या मिचेल मार्शने अवघ्या ३८ चेंडूत ९० धावांची झंझावाती खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर लखनौने १८८ धावांचे लक्ष्य अवघ्या १६.४ षटकांत पूर्ण केले आणि चेन्नईच्या अडचणीत भर घातली.
या पराभवानंतर चेन्नईचा संघ गुणतालिकेत १२ सामन्यांत १२ गुणांसह थेट सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. आता चेन्नईकडे साखळी फेरीत केवळ दोनच सामने शिल्लक राहिले आहेत. मात्र, आव्हान इथेच संपत नाही; चेन्नईचे पुढील दोन्ही सामने सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या बलाढ्य संघांविरुद्ध आहेत, जे स्वतः प्लेऑफच्या शर्यतीत भक्कम स्थितीत आहेत.
चेन्नई सुपर किंग्ससाठी आता प्रत्येक सामना 'करा किंवा मरो' असा झाला आहे. जर संघाला अंतिम ४ मध्ये स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील. दोन्ही सामने जिंकल्यास चेन्नईचे १४ सामन्यांत १६ गुण होतील. मात्र, निव्वळ विजय मिळवून चेन्नईचा मार्ग सुकर होणार नाही, कारण आता त्यांचे भवितव्य इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून असणार आहे.
चेन्नईच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा राजस्थान रॉयल्स ठरण्याची शक्यता आहे. राजस्थानचे सध्या ११ सामन्यांत १२ गुण असून त्यांचे अजून तीन सामने बाकी आहेत. राजस्थानचा सामना दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्याशी होणार आहे.
जर राजस्थानने तिन्ही सामने जिंकले, तर चेन्नईचा पत्ता कट होऊ शकतो. त्यामुळे राजस्थानने किमान एक सामना गमावावा, अशी प्रार्थना चेन्नईचे चाहते करतील. जर दोन्ही संघ १६ गुणांवर बरोबरीत राहिले, तर नेट रन रेट (NRR) मुख्य भूमिका बजावेल. सध्या चेन्नईचा नेट रन रेट +०.०२७ असा अत्यंत कमकुवत आहे, जी त्यांच्यासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.
चेन्नईचा संघ १४ गुणांसहही प्लेऑफ गाठू शकतो, पण हा मार्ग अत्यंत गुंतागुंतीचा आणि नशिबावर अवलंबून आहे. जर चेन्नईने उर्वरित दोनपैकी एक सामना गमावला, तर त्यांना पंजाब किंग्सच्या पराभवावर अवलंबून राहावे लागेल. आरसीबी आणि गुजरातने यापूर्वीच १६ गुणांचा टप्पा ओलांडून प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे.
अशा स्थितीत चेन्नईला जर १४ गुणांवर पात्र व्हायचे असेल, तर पंजाबला आपले दोन्ही सामने गमावावे लागतील आणि राजस्थानला तीनपैकी दोन सामन्यांत पराभूत व्हावे लागेल. याशिवाय चेन्नईला आपला एकमेव विजय मोठ्या फरकाने मिळवून नेट रन रेट सुधारावा लागेल. थोडक्यात सांगायचे तर, चेन्नईचे भवितव्य आता स्वतःच्या कामगिरीसोबतच 'वरुणराजा' आणि 'इतर संघांच्या नशिबावर' अवलंबून आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.