दुबई: सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या या भारतीय संघात जवळपास सर्वच खेळाडू मॅचविनर आहेत, अनुभवही मोठा आहे आणि सातत्यही कमालीचे आहे म्हणूनच हा भारताचा सार्वकालिक श्रेष्ठ संघ आहे, असे कौतुक ऑस्ट्रेलियाचे नामवंत माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी केले आहे.
रोहित शर्माच्या संघाने दोन वर्षांपूर्वी टी-२० विश्वकरंडक जिंकला आणि आता आठवडाभरापूर्वी सूर्यकुमार यादव कर्णधार असलेल्या भारतीय संघाने न्यूझीलंडवर ९६ धावांनी मात करून मायदेशात विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला.
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये भारताचे कमालीचे वर्चस्व आहे. २०२३ पासून आयसीसीच्या चार महत्त्वांच्या स्पर्धांमध्ये मिळून केवळ दोनच सामने गमावले आहेत. २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत सुपर-८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशा दोनच सामन्यांत भारताचा पराभव झाला आहे.
या भारतीय संघाच्या दृष्टीने नकारात्मक अशा कोणत्याच गोष्टी नाहीत. हे केवळ टी-२० संघाबाबतच नव्हे, तर गेल्या पाच-सहा वर्षांत एकूणच भारतीय संघांचा व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये दरारा निर्माण झालेला आहे, असे पाँटिंग यांनी सांगितले.
ते पुढे म्हणतात, यंदाची टी-२० स्पर्धा सुरू होण्याअगोदरपासूनच भारतीय संघात मॅचविनर्सची संख्या अधिक होती. अनुभवातही त्यांचे खेळाडू सर्वांपेक्षा पुढे होते. सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वविजेतेपद मिळवणे सोपे नाही. हा पराक्रम या भारतीय संघाने केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.