पणजी: येत्या १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीतील भाजप उमेदवार पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येतील. काही मतदारसंघांतील उमेदवार निश्चित झालेले आहेत. तर, काही ठिकाणचा सर्व्हे आणि चाचपणी अजूनही सुरू असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हा पंचायतीतील उमेदवारांच्या निवडीसंदर्भात उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्ह्यांतील भाजप आमदार आणि कार्यकर्त्यांशी सलग दोन दिवस बैठका घेतल्यानंतर भाजपच्या निवडणूक समितीची बैठक सोमवारी भाजपच्या पणजीतील कार्यालयात पार पडली. या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली.
याबाबतची दुसरी बैठकही लवकरच घेण्यात येणार आहे. प्रत्येक निवडणूक ही भाजपसाठी ‘फायनल’ असते. पुढील आठवड्यात ५० ही मतदारसंघांतील नावे जाहीर करण्यात येतील, असे दामू नाईक म्हणाले. यावेळच्या निवडणुकीत भाजपकडून ८० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.
त्यात पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलेल्यांचाही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते नाराज होतील का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, भाजपची उमेदवारी आपल्याला मिळावी, असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु, तसे होत नाही. त्यामुळे ते नाराज होतात. परंतु, त्यांची नाराजी जास्त काळ राहत नाही, असेही नाईक यांनी नमूद केले.
विरोधकांच्या एकीचा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपवर काही परिणाम होईल का? असे विचारले असता, केवळ हात वर करून काहीही होत नाही. भाजपचे काम संघटनात्मक आहे. सरकारने केलेल्या कामाची पावती जनता भाजप उमेदवारांना देते. त्याचा प्रत्यय बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालातूनही दिसून आलेला आहे. त्यामुळे विरोधक एकत्र आले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असा ठाम विश्वासही दामू नाईक यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.