पणजी : ‘गुगल’वर मिळालेल्या चुकीच्या लिंकवर महाविद्यालयीन प्रवेशाचा प्रयत्न केल्याचा फटका आज अनेक विद्यार्थ्यांना बसला. ‘उच्च शिक्षण संचालनालय’ असे गुगलवर शोधल्यावर येणाऱ्या पहिल्या लिंकवर क्लिक केलेल्या विद्यार्थ्यांना या अनुभवाला सामोरे जावे लागले.
यानंतर उच्च शिक्षण संचालनालयात या विद्यार्थ्यांनी केलेल्या चौकशीवेळी ही लिंक चुकीची होती, असे निष्पन्न झाले. ‘समर्थ पोर्टल’वर विद्यार्थ्यांनी लॉगीन करून माहिती नोंदवून प्रवेशासाठी पाच महाविद्यालयांचा पर्याय द्यावा, असे सांगण्यात आले. काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिका अद्याप न दिल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशाचा पहिला टप्पा पूर्ण करता आला नाही.
राज्यात आजपासून महाविद्यालयीन प्रवेशासाठी ‘समर्थ पोर्टल’द्वारे अर्ज करण्याचा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली; परंतु पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थ्यांनी एकाचवेळी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याने ‘समर्थ पोर्टल’चा सर्व्हर जॅम झाला. अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्याने अनेक विद्यार्थी पहिल्या दिवशी अर्ज करू प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत. त्यातूनही सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्रक्रियेतील अडचणी येणाऱ्या समस्यांबाबत संचालनालयाने सांगितले की, पहिल्या दिवशी ज्यावेळी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात येते, त्यावेळी वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात व्हिजिटर्स येऊ लागल्याने सर्व्हरवर ताण येतो. त्यामुळे पुढील काही दिवस सर्व्हरची क्षमता वाढविण्यास सांगण्यात आले आहे. अशी समस्या दरवर्षी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी तसेच मुदतीच्या अखेरच्या दिवशी उदभवते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज भरण्यासाठी न थांबता मधल्या काळात अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना जर काही समस्या जाणवत असल्यास त्यांनी ‘अभाविप’शी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही जिल्ह्यांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. ज्यांना अर्ज प्रक्रियेबाबत काही माहिती हवी असेल, त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन ‘अभाविप’चे सहसंयोजक शुभम मळीक यांनी केले आहे.
‘सर्व्हर जॅम’च्या समस्येसोबतच विद्यार्थ्यांना इतरही काही समस्या जाणवतात आहेत. जसे की, काही विद्यार्थ्यांना अद्याप शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला नाही तसेच विद्यापीठाने अजून निकालही दिलेले नाहीत. ही कागदपत्रे अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बंधनकारक आहेत. परंतु अजून ही कागदपत्रेच विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याने प्रक्रिया पूर्ण करण्यास अडथळा आहे.
महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आजपासूनच सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यासाठी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना काही तांत्रिक बाबींच्या अडचणी येत आहेत; परंतु त्यांनी काळजी करू नये. ३० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचा कालावधी आहे. तशीच काही समस्या जाणवल्यास त्यांचे निरसन केले जाईल.डॉ. महादेव गावस, अधिकारी, उच्च शिक्षण संचालनालय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.