
पणजी: राज्याच्या शिक्षण खात्याने कोणत्या निकषांवर अकरावीसाठी प्रवेश द्यावेत हे कळवलेले असतानाही उच्च माध्यमिक विद्यालयांनी गुणवत्ता यादी तयार करणे सुरू केले आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्या लक्षात ही बाब आणल्यानंतर पालकांच्या माहितीसाठी प्रवेशाचे निकष सार्वजनिकरीत्या प्रदर्शित करणे संबंधित विद्यालयांना बंधनकारक करू, असे त्यांनी सांगितले आहे.
दहावीचा निकाल काल जाहीर झाल्यानंतर आजपासून अकरावीच्या प्रवेशाला सुरवात झाली आहे. काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी अजून प्रवेशिका घेण्यास सुरवात केली नाही; परंतु राज्यातील काही खासगी उच्च माध्यमिक विद्यालयांनी सुरवात केली आहे. विद्यार्थ्यांना अकरावीत
प्रवेश देण्यासंबंधी प्रत्येक शाळेने आपापल्या पद्धतीने निकष ठरवले आहेत. सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येते.
काही खासगी विद्यालयांमध्ये दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार अधिक गुण मिळालेल्यांना प्राधान्य, तर काही उच्च माध्यमिक विद्यालये इंग्रजी, विज्ञान आणि गणित विषयात पडलेल्या गुणांच्या
आधारे प्रवेश देतात; परंतु अकरावीला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत नियम असणे गरजेचे असल्याचे मत काही शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
जेणेकरून विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळविताना सुसूत्रता येईल, विशिष्ट नियम केल्यास सर्वसमावेशकता येईल, असे
मानले जात आहे. सध्या डिजिलॉकरमुळे तत्काळ निकालाची ‘सॉफ्ट कॉपी’ मिळते. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशिकांना अर्ज करणे सोपे जाते; परंतु ज्यावेळी निकालाची मूळ प्रत मिळते, त्यावेळी प्रवेश निश्चित केला जातो. प्राथमिक स्वरूपात प्रवेश मिळवायला डिजिलॉकरचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहे.
१. अकरावीला प्रवेश देण्यासाठी शिक्षण संचालनालयाने विशिष्ट नियम जारी केले आहेत. त्यानुसारच प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी शिक्षण खात्याची अपेक्षा आहे.
२. मात्र, काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी प्रवेशासाठी आलेल्या पालकांना व विद्यार्थ्यांना ७५ टक्के गुण मिळाले नाहीत, तर विज्ञान शाखेला प्रवेश नाही असे जाहीरपणे सांगणे सुरू केले आहे.
३. शाळा व्यवस्थापनातील व्यक्ती सत्ताधारी भाजप आणि सरकारच्या जवळ असल्याने असे वागणे, त्यांनी राजरोसपणे सुरू केल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश देताना दहावीत ‘गणित-१’ विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. ‘गणित-१’ विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन जागा असतील, तर नंतर त्या जागा ‘गणित-२’ विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असा विज्ञान शाखेसंबंधीचा गोवा बोर्डाचा नियम आहे.
भगीरथ शेट्ये, अध्यक्ष गोवा बोर्ड
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.