पणजी: राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल घडत आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ, अशा प्रकारांमुळे नागरिक हैराण आहेत.
कालच्या दिवसात राज्यात कमाल तापमान ३४.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. यावेळी आर्द्रतेची पातळी तब्बल ७८ टक्क्यांपर्यंत गेली होती. विशेष म्हणजे, सरासरी तापमानाच्या तुलनेत राज्यात यंदा १.३ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे. ही वाढ हवामान बदलाच्या दृष्टीने चिंतेची बाब मानली जात आहे.
मागील २४ तासांत राज्याच्या काही भागांमध्ये तुरळक स्वरूपात पावसाची नोंद झाली आहे. फोंडा येथे सर्वाधिक ९ मिमी पावसाची नोंद झाली असून, धारबांदोडा येथे ३.४ मिमी, मुरगाव येथे ०.२ मिमी आणि सत्तरीच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. राज्यात आतापर्यंत एकूण १२.७ मिमी इतक्या अवकाळी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. गोवा वेधशाळेच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असून, उन्हाचा चटका कायम राहण्याची चिन्हे आहेत.
हवामानात होणाऱ्या या अस्थिरतेमुळे नागरिकांना उष्माघात, त्वचारोग आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे हवामान विभागाने आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. उन्हापासून संरक्षण करणारे उपाय, पुरेसे पाणी पिणे आणि घराबाहेर पडताना डोक्यावर छत्री अथवा टोपीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.