मडगाव: ग्रामीण भागातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने पर्यटन ग्राम विकास योजना सुरू केली असून या योजनेखाली दक्षिण गोव्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेला चांदर गाव आणि निसर्गाने नटलेल्या खोतिगाव या दोन गावांसह एकूण पाच गावांचा विकास करण्याचे ठरविले आहे. बांदोडा, चोडण आणि साळ या योजनेखाली विकसित होणारी अन्य गावे आहेत.
या योजनेखाली केंद्र सरकारकडून एकूण अडीच कोटी रुपये गोवा सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाला मिळणार असून या अंतर्गत प्रत्येक गावांवर ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. अधिक निधीची गरज लागल्यास राज्य सरकारला केंद्र सरकारकडे पुन्हा मागणी करावी लागेल, अशी माहिती संबंधितांनी दिली. हे गाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी स्थानिक पंचायतीचेही मत विचारात घेतले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गोव्यातील पर्यटन किनारपट्टीपासून अधिक विस्तारीत करण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास करून पर्यटकांना या गावाकडे वळविण्याचा हेतू या योजनेमागे आहे. या गावांतील वैशिष्ट्ये हेरून त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास कसा करता येणे शक्य आहे ते ठरविण्यासाठी सल्लागारांची मदत घेतली जाणार असून स्थानिक पंचायतींचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर सल्लागाराकडून यासंबंधीचा आराखडा तयार केला जाईल.
या योजनेअंतर्गत या गावात एक सभागृह उभारून त्यात गावातील सांस्कृतिक वैशिष्ट्ये दाखविणारे दालन उभे केले जाणार आहे. त्यात गावातील संस्कृती आणि पोर्तुगीजपूर्व परंपरा पर्यटकांना दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या पाच गावांपैकी चांदर ही कदंब राजवटीतील राजधानी असून त्यामुळे या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पाच गावांपैकी खोतिगाव या गावाला २०२३ साली, तर बांदोडा या गावाला २०२४ साली केंद्र सरकारचा भारतातील ‘उत्कृष्ट पर्यटन ग्राम’ हा पुरस्कार प्राप्त झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.