
तेनसिंग रोद्गीगिश
गेल्या दोन सहस्रकांमध्ये देशभरातील गावांमध्ये जमिनीची मालकी आणि व्यवस्थापन कसे विकसित झाले, यावर विचारमंथन आपण या लेखात करू. गावकरीचा उदय कसा झाला, यामागची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी याचा आपल्याला फार उपयोग होईल. रयतवारी गाव आणि संयुक्त गाव असे गावांचे दोन प्रकार बेडेन-पॉवेल यांनी वर्णिले आहेत.
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात देशभरातील गावांत हे दोन प्रकार होते. रयतवारी हा प्रकार विंध्यच्या दक्षिणेस प्रामुख्याने (जरी सर्वत्र नसला तरी) आणि नंतरच्या उत्तरेस संयुक्त गाव हा प्रकार आढळतो, असे बेडेन-पॉवेल म्हणतात. (संदर्भ : बेडेन-पॉवेल, १८९६: द इंडियन व्हिलेज कम्युनिटी, ८)
बेडेन-पॉवेल यांच्या मते, ‘समाजाचा आदिवासी टप्पा’ हा रयत्तवारी गावांच्या उत्क्रांतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तसेच प्रदेशाचे कुळनिहाय विभाजन देखील आहे, ज्यामध्ये अनेक गावे असतात, प्रत्येक गावाचा स्वतःचा प्रमुख असतो, जो रयत्तवारी संस्थेचा एक स्वाभाविक आणि आवश्यक भाग असतो.
कुळातील प्रत्येक सदस्याला त्याच्या गरजेनुसार पुरेशी जमीन वाटप करण्याचा अधिकार प्रमुखाकडे होता. परंतु आधुनिक काळात जशा पद्धतीने आपण जमिनीच्या मालकीकडे पाहतो, तसे पूर्वी नव्हते. आदिवासी लोकसंख्येच्या तुलनेत शेती करण्यायोग्य भूमी खूप होती. त्यामुळे, आदिवासी कुटुंबे त्यांना हवी तिथे वस्ती करू शकत होती.
तरीही, प्रत्येक गावाचा प्रमुख नेहमीच एक महत्त्वाची व्यक्ती असल्याने, त्याच्या मार्गदर्शनाखाली साफसफाई आणि वसाहतीची जागा निवडली जात असे यात शंका नाही. त्यासाठी जमिनीची मालकी असणे गौण होते.
प्रमुखाचे स्थान नेहमीच वंशपरंपरागत असे. जेव्हा राजांनी प्रदेशावर आपले वर्चस्व वाढवले, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी व महसूल वसूल करण्यासाठी सरदारांना अधिकार दिले. (संदर्भ : बेडेन-पॉवेल, १८९६: द इंडियन व्हिलेज कम्युनिटी, ९).
या उलट, ‘संयुक्त गाव’ हे आदिवासींच्या जमिनीवर शेती न करणाऱ्या जमीनदारांनी वर्चस्व निर्माण केल्याने तयार झाले. हे जमीनदार स्वत: कृषिवल असत, जमीन कसत किंवा लागवड न झालेल्या जमिनीवर आश्रितांना, शेती करणाऱ्यांना सोबत घेऊन शेती करत असत, असे बेडेन-पॉवेल यांनी म्हटले आहे. (संदर्भ : बेडेन-पॉवेल, १८९६: द इंडियन व्हिलेज कम्युनिटी, २०).
‘संयुक्त गाव’ प्रकार प्रत्यक्षात ‘जमीनदारी’ किंवा ‘पटीदारी’ प्रकारात मोडतात. यात गावातील जमिनी संयुक्त कुटुंबाची मालमत्ता असतात. संयुक्त गावात, व्यक्तींचे दोन वर्ग असतात, एकाकडे मालकी हक्क असतात, तर दुसऱ्याकडे मालकी हक्क नसतात.
(संदर्भ : श्रीनिवास, १९५१: सोशल स्ट्रक्चर ऑफ म्हैसूर व्हिलेज, द इकॉनॉमिक वीकली, ३० ऑक्टोबर १९५१) हे प्रकार गावकारी व्यवस्थेपेक्षा खूप वेगळे आहेत. काही विद्वान, गावकारी ही मालकीच्या संयुक्त कुटुंबांची एक संस्था आहे, असे गृहीत तिला बेडेन-पॉवेलच्या प्रकारांत घालतात. जरी काही गावांमध्ये गावकरी कालांतराने ‘मालकीच्या संयुक्त कुटुंबांची संस्था’मध्ये बदलली असली, तरी तो अपवाद आहे.
संपूर्ण भारतात असलेल्या ग्रामरचनेच्या दोन्ही प्रकारांत गावकारी बसत नाही. म्हणून आपल्याला त्याचे मूळ शोधण्याची गरज आहे. परंतु, या संदर्भात शिलालेख किंवा इतर नोंदी नसल्यामुळे, मौखिक परंपरा ही माहितीचा एकमेव स्रोत आहे.
सह्याद्री भागातील ग्रामरचना सामान्यतः दख्खनमध्ये आढळणाऱ्या रचनेशी कमी-अधिक प्रमाणात मिळतीजुळती आहे. समुद्राच्या ओसरण्यापूर्वी किनारी भागातील ग्रामरचनेत साम्य आढळते. कारण सह्याद्रीच्या दोन्ही बाजूंच्या वसाहती जवळपास एका कालावधीत झालेल्या स्थलांतरामुळे तयार झाल्या आहेत. पण, अशा निष्कर्षापर्यंत पोहोचताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. शेतीयोग्य हवामान सगळीकडे सारखे नाही.
बेडेन-पॉवेलच्या ‘रयतवारी गाव’ व ‘संयुक्त गाव’ या दोन प्रकारच्या गावांच्या मालकी हक्कांमधील फरकाकडे आपल्याला गाळाच्या मैदानातील शेती आणि अधिक कठीण भूभागातील शेती यातील फरक म्हणूनही पाहावे लागेल. या संदर्भात, आपल्याला फिलिप नेरी झेवियर यांनी अधोरेखित केलेली परिस्थिती लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, जिथे जिथे राजा, जमीनदार यांचे महसुली अधिकारी कर किंवा खंडणी गोळा करतात, तिथे तिथे मालमत्तेची कल्पनाच नष्ट होते. (संदर्भ : झेवियर, १९०७: बॉस्केजो हिस्टोरिको दास कोमुनिडेड्स दास अल्डियास डोस कॉन्सेल्होस दास इल्हास, साल्सेत ई बार्देस, खंड १, ७५). दख्खनमध्ये शेतीपासून उत्पन्न मुळातच कमी आणि वर वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागला आहे.
त्या दुर्दशेचे पुरावे पुरातत्त्वीय, वनस्पतिशास्त्रीय अभ्यासांमध्ये सापडतात. अशा परिस्थितीत त्या प्रदेशातील गावांच्या मालकीची कोणतीही स्थिर व्यवस्था नसणे साहजिक आहे. खरे तर, आर्कामोन स्पष्टपणे म्हणतो की, ‘कर्ज किंवा करांनी दबलेल्या, दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी जमीन आणि राजाला सोडून दिले.
घरातील भांडी आणि गुरेढोरे घेऊन पळाले. त्यांच्या उपजीविकेसाठी शेती करू शकतील, अशा या द्वीपकल्पात आले. (संदर्भ : फर्नांडिस, १९८१: उमा दिस्क्रिसाओ ई रिलेसाव दे ‘दे ससाताना पेनिन्सुला इन इंडियास्टॅटू’ टेक्स्टस इनेडिटी, ९४).
ईसापूर्व २०००पासून समुद्र हळूहळू मागे हटत गेला आणि जमीन उपलब्ध झाली असावी, असे मानले जाते. (संदर्भ : हाशिमी, १९९५: होलोसीन सी लेव्हल फ्लक्ट्युएशन्स ऑन वेस्टर्न इंडियन कॉन्टिनेंटल मार्जिन, जर्नल ऑफ द जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, ४६) आणि सुमारे ईसापूर्व १०००च्या आसपास लोकांनी प्रभावित प्रदेशातील गावे सोडण्यास सुरुवात केली असावी असे मानले जाते.
(क्लटन-ब्रॉक, २०१२: अॅनिमल अॅज डॉमिस्टिकेट्स, ८९). समुद्र मागे हटून उपलब्ध झालेल्या जमिनीवर या स्थलांतरितांनी गावे वसवली आणि गावकारीची स्थापना केली. कदाचित असेही असू शकते की त्यांनी इथे जी ग्रामरचना उभारली ती पूर्वी ते ज्या प्रदेशातून पळून आले होते, त्या प्रदेशातही प्रचलित होती. ती ग्रामरचना दुष्काळ आणि त्यांच्या शासकांच्या खंडणीखोरीमुळे नष्ट झाली असावी. तीच त्यांनी त्यांच्या नव्या मातृभूमीत पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे लोक कोण असू शकतात? बहुधा ते दख्खन चाड्डी होते. सासष्टी, बार्देश आणि तिसवाडी येथील १३१ गावकऱ्यांपैकी ४५ गावकरी केवळ दख्खनचे चाड्डी होते याचे हेच कारण असू शकते का?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.