Rohan Khaunte| Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: डॅशिंग पर्यटनमंत्र्यांची सरप्राईज भेट

डॅशिंग पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर अचानक भेट दिली.

दैनिक गोमन्तक

Rohan Khaunte: राज्यातील समुद्रकिनारी शॅकधारकांनी अतिक्रमणे करून मोकळीक असलेल्या जागेत डेकबेडस् व अम्ब्रेला उभ्या केल्या आहेत. यापूर्वी उच्च न्यायालयानेही वारंवार निर्देश दिले आहेत, तरी त्याच्या अंमलबजावणीकडे सरकारकडून दुर्लक्ष होत आले आहे.

पर्यटन अधिकारी व पोलिस यांच्याशी असलेल्या लागेबांधेमुळे या अतिक्रमणाविरुद्ध कारवाई होताना दिसत नाही.

त्यामुळे डॅशिंग पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर अचानक भेट दिली. तेथील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तेथील जलक्रीडा प्रकाराबाबत पर्यटकांची कशी फसवणूक केली जाते, त्याचे प्रत्यक्ष उदाहरण एका पर्यटकाने त्यांच्याकडे तक्रार करून दिले.

या किनाऱ्यावरील अंदाधुंदीला जबाबदार कोण? हे अगोदर मंत्र्यानी शोधून काढायला हवे. यामध्ये कळंगुट पंचायतपासून ते पोलिस व पर्यटन अधिकारी यांचे हात बरबटलेले आहेत. अतिक्रमणे हटवण्यासाठी जरी निर्देश देण्यात आले तरी ती पुन्हा उभी राहतात.

त्याला कोणाला जबाबदार धरणार? मंत्र्यांची ही आजची अचानक भेट समुद्रकिनाऱ्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी की आणखी कशासाठी अशी चर्चा तेथील समुद्रकिनाऱ्यांवरील व्यापाऱ्यांमध्ये सुरू होती.

महाराज भक्त ‘एल्टन’

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सच्चे भक्त केवळ मंत्री सुभाषच नाहीत, तर केपे मतदारसंघाचे आमदार एल्टन डिकॉस्टाही आहेत. हे एल्टनने आपल्या वक्तव्याने सिद्ध करून दाखविले आहे.

संगतीचा परिणाम होतो, असे म्हणतात, ते खरे एल्टन व सुभाष फळदेसाई याचे चांगले सबंध आहेत, म्हणूनच सुभाषप्रमाणे एल्टनही महाराज भक्त झाले असावेत.

बेतुल किल्ल्यावर यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री शिवजयंती करायचे. बेतुल किल्ल्याचे संवर्धन व्हावे, अशी बाबूची ही इच्छा होती. मात्र ती प्रत्यक्षात उतरली नाही.

आता एल्टन यांनी बेतुल किल्याचे संवर्धन करण्याची मागणी पुरातन खात्याकडे केली आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्त असल्याचे एल्टन अभिमानाने सांगतात.

भीती नेमकी कशाची?

म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून सध्या केंद्र सरकारच्या मदतीने कुरघोडी सुरु आहे. याविषयी गोव्यात सध्या म्हादईच्या संरक्षणार्थ जनआंदोलन सुरु आहे. सत्ताधारी पक्ष सोडल्यास इतर राजकीय नेते आपली विचारधारा बाजूला ठेवून या चळवळीत सहभाग घेताहेत.

मात्र, हवा तसा प्रतिसाद अद्याप लोकांकडून मिळत नाही. जेमतेम समाजकार्यकर्ते किंवा लोक समोर येताहेत, परंतु हा लढा पूर्ण ताकदीने पुढे न्यायचा असल्यास मोठा जनसहभाग हा एकमेव मार्ग आहे.

याविषयी म्हापशात रविवारी मेणबत्ती व मशाल मिरवणूक झाली. यावेळी काही वक्त्यांनी याप्रश्नी आपली खंत व्यक्त केली.

अजूनही लोक म्हादईच्या संरक्षणात रस्त्यावर उतरण्यापासून घाबरताहेत! याची अनेक कारणे किंवा कारणामीमांसा विविध असू शकतात. याचे प्रमुख कारण हे प्रत्येकांची काही वैयक्तिक कामे किंवा सरकार नोकरी!

अलिकडच्या काळात सरकारी नोकरी भरती प्रक्रिया सुरू असून अनेक खात्यात परीक्षा तसेच काही परीक्षांचे निकाल यायचे आहेत.

त्यामुळे आपण जर चळवळीत सहभागी झाल्यास सत्ताधाऱ्यांकडून लक्ष्य होऊ शकतो. या भीतीपोटी अनेकजण मनात असताना या लढ्यात सहभाग घेण्यास कचरत आहेत का? हा प्रश्न पडतो.

उत्पलचा निराशेचा सूर मनोहर पंतांनी गोव्याच्या राजकारणाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते, त्यांच्या पूर्वी व त्यांच्यानंतरही कोणाला ते शक्य झालेले नाही, हे त्यांचे विरोधकही मान्य करतात.

राजकारण चांगले व्हायचे असेल, तर चांगल्या लोकांनी राजकारणात यावे लागेल असे ते नेहमी म्हणत. पण प्रत्यक्षात तसे घडलेले दिसत नाही.

नाही म्हणायला त्यांच्या प्रमाणेच उच्च शिक्षित असलेले त्यांचे पुत्र उत्पल यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करून पाहिला पण अल्पावधीतच ते निराश झालेले दिसतात.

मडगावातील सारस्वत संमेलनात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणाचा स्तर खालावलाय म्हणून व्यक्त केलेली खंत तेच दर्शवतेय. त्यांची ही निराशा की सारवासारव अशी चर्चा श्रोत्यांत मात्र सुरू होती.

मोठ्या राज्याची जबाबदारी!

राजकारणाची आणि समाजकारणाची चांगली जाणीव असलेला भारतीय जनता पक्षाचा नेता म्हणजे राजेंद्र आर्लेकर. पेडणेचा आमदार म्हणून निवडून येऊन सभापती आणि त्यानंतर पंचायतमंत्री म्हणून त्यांनी राजकारणात कारकीर्द केली.

पण नंतरच्या काळात त्यांना पेडणेची तिकीट न देता हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले.

हिमाचलला जाताना राजेंद्र आर्लेकर यांनी कोणतीच खळखळ केली नाही. तेथेही आपल्या राजकारण चातुर्याची त्यांनी चुणूक दाखवली, त्यामुळेच की काय? त्यांना आता बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे.

बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम कोणते उद्‍गार काढले असतील तर ते म्हणजे, आपल्याला आता मोठ्या राज्याची जबाबदारी सांभाळायची आहे. एक सुसंस्कृत आणि समाजाच्या उणिवांची जाणीव जाणणारा नेता म्हणून राजेंद्र आर्लेकर यांची ओळख आहे,

त्यामुळेच कदाचित लोकांचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, तरीपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांची कारकीर्द उत्तरोत्तर वाढत रहावी, अशाच शुभेच्छा गोमंतकीय हमखास देतील, यात शंकाच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT