चेन्नई: तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेवरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीसुद्धा त्यांना बहुमताचा आकडा गाठता न आल्याने त्यांची कोंडी झाली आहे. विजय यांनी आज राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला खरा पण संख्याबळाचे गणित जुळत नसल्याने त्यांनी तूर्त ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
त्यामुळे उद्याच्या (ता.७) विजय यांच्या प्रस्तावित शपथविधी सोहळ्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार विजय यांनी राज्यपालांकडे ११३ विजयी उमेदवारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले असता राज्यपालांनी ११८ विजयी उमेदवारांच्या पाठिंब्याचे पत्र मागितले आहे. विजय यांनीही त्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला आहे. ‘टीव्हीके’ पक्षाला २३४ पैकी १०८ जागांवर विजय मिळाला असून बहुमतासाठी त्यांच्याकडे
दहा जागा कमी आहेत. विजय हे दोन ठिकाणांहून विजयी झाले आहेत. अखिल भारतीय काँग्रेसने ‘टीव्हीके’ला आज अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला आहे. या निवडणुकीत ‘द्रमुक’ला ५९, ‘अण्णाद्रमुक’ला ४७, काँग्रेसला पाच जागांवर विजय मिळाला असून पीएमके (४), आययूएमएल (२), भाकप (२), व्हीसीके (२) आणि माकप (२) यांनाही अल्प यश मिळाले आहे. याशिवाय, तमिळनाडूत पाय रोवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला असून ‘डीएमडीके’ आणि ‘एएमएमके’ या पक्षांनाही एकच जागा मिळाली आहे.
‘अण्णाद्रमुक’ने ‘टीव्हीके’बरोबर बोलणी सुरू केली असून आघाडीबाबतचा निर्णय दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च पातळीवर लवकरच घेतला जाईल, असे सुरुवातीला सांगितले होते. नंतर मात्र ‘टीव्हीके’ला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. काँग्रेसने आज अनेक वर्षांचा मित्रपक्ष असलेल्या ‘द्रमुक’ची साथ सोडत ‘टीव्हीके’ला अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला.
विजय यांनी पाठिंब्याचे पत्र देण्याची विनंती केल्यानंतर तसे पत्र दिल्याची माहिती तमिळनाडू काँग्रेसचे प्रभारी गिरीश चोडणकर यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी चित्रपटातून संन्यास जाहीर करत राजकारणात प्रवेश केलेल्या विजय यांनी पहिल्याच निवडणुकीत आपला करिष्मा दाखविला. ते स्वत: तिरुचिरापल्ली पूर्व आणि पेराम्बूर या दोन जागांवरून निवडून आले आहेत.
बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा शनिवारी (ता.९) ब्रिगेड परेड ग्राउंडवर सकाळी दहाच्या सुमारास पार पडेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकतात.
हिमंता बिस्व सरमा यांनी आज आसामच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ केला. आता येत्या अकरा मेनंतरच त्यांचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या विधिमंडळ पक्षाची बैठक लवकरच पार पडणार असून त्यात नव्या नेत्याची निवड होऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.