सासष्टी: तळेबांद परिसरातील शेतकऱ्यांचे प्रमुख जलस्रोत असलेल्या तळेबांद तळ्याचे पाणी गेल्या काही दिवसांत प्रदूषित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक वर्षांपासून या तळ्यातील पाण्यावर अवलंबून राहून परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भात, भाजीपाला आणि इतर पिकांची लागवड करत होते. मात्र आता या पाण्याचा रंग वासट आणि दुर्गंधीयुक्त झाला असून पिकांवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे.
या गंभीर प्रकारामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार वेन्झी व्हिएगस यांची भेट घेऊन तळ्याचे पाणी दूषित होण्यामागील कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. शेतकरी सांतान परेरा यांनी सांगितले की, ‘‘रात्रीच्या वेळी काही टॅंकर या भागात येताना दिसतात.
कदाचित त्यांनी या तळ्यामध्ये सांडपाणी सोडले असावे, अशी शंका आहे.’’ या प्रकरणी जलसंपदा खात्याचे कर्मचारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तळ्याची पाहणी केली आहे.
प्राथमिक निरीक्षणात पाण्याच्या गुणवत्तेमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले आहे. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, दूषित पाण्यामुळे त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
त्यामुळे या प्रकारामागील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि तळ्याचे शुद्धीकरण करून पाणी पुन्हा शेतीस योग्य करावे. स्थानिक ग्रामस्थांनीही या प्रकारामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.