वाळपई: ‘टीसीपी कलम ३९/अ’ हे केवळ मंत्री विश्वजीत राणे यांनी संमत केलेले नाही, तर विधानसभेत सर्व सत्ताधारी आमदार, मंत्री यांनी मंजूर केले होते. तरीही विरोधक राणेंना त्रास देत आहेत. हे षडयंत्र अतिशय गंभीर आहे. विरोधकांना पुढे करून केवळ राणेंना डिवचण्यामागील खरा धनी कोण, असा सवालही उपस्थित होतो आहे.
राणेंनी केवळ नेहमीच विकासकामांना प्राधान्य दिले, गरिबांची सेवा केली. म्हणूनच २०२७ साली राणेंच्या मागे ढालीसारखे उभे राहून पुन्हा त्यांना विजय मिळवून देऊया. सद्यस्थितीत केवळ राणे यांनाच टार्गेट केले जात आहे.
असले प्रकार कदापि सहन केले जाणार नाहीत. प्रसंगी ४५ हजार नव्हे, तर ५० हजार लोकांच्या फौजेनिशी पणजीत धडकून राणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा सज्जड इशारा सत्तरीवासीयांनी वाळपईत दिला.
हातवाडा-वाळपई जंक्शनवर सायंकाळी विश्वजीत राणे यांच्या समर्थनार्थ तसेच विरोधकांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. सत्तरीची जनता झोपलेली नाही. ती शांत आहे. तिला डिवचू नका, अशी चेतावनीही यावेळी देण्यात आली.
सत्तरी तालुक्याचा सर्वांगीण विकास विरोधकांना बघवत नाही. काही विघ्नसंतोषी लोक गलिच्छ राजकारण करीत केवळ मंत्री विश्वजीत राणे यांना टार्गेट करीत आहेत. त्यामागे छुपी यंत्रणा आहे, असा आरोप करण्यात आला.
यावेळी पिसुर्लेचे सरपंच देवानंद परब, गुळेलीचे सरपंच नितेश गावडे, होंडाचे सरपंच शिवदास माडकर, केरी जि.पं. सदस्य नीलेश परवार, नगराध्यक्ष प्रसन्ना गावस, सोमनाथ काळे, रामनाथ डांगी, बी.डी. मोटे, राजाराम परवार, दीक्षा, सय्यद सरफराज, दिगंबर नाईक, देवांग गावकर, आदित्य बोट्टरकर यांनीही विचार मांडून राणेंना समर्थन दिले. उदय सावंत यांनी सूत्रनिवेदन केले.
उदयसिंह राणे म्हणाले, सत्तरीची जनता सजग झाली आहे. विरोधकांनी मंत्र्यांच्या खासगी निवासस्थानी गोंधळ घातला, हा प्रकार जाणीवपूर्वक केलेला आहे. बाबा हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करतात. ते देवमाणूस आहेत. ते करीत असलेले कार्य विरोधकांना बघवत नाही; पण सत्तरीची जनता नेहमीच राणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.
‘आमचो लीडर, आमचो लीडर, बाबा आमचो लीडर’, ‘बाबा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देऊन लोकांनी राणेंना पाठिंबा दिला. तसेच शेवटी मेणबत्ती प्रज्वलित करून समर्थनही दिले.
राणेंच्या खासगी बंगल्यावर विरोधकांनी मोर्चा नेत माणुसकीला काळीमा फासला होता. त्यावेळी लोक पणजीतून चालत गेले होते. पोलिसांचा फौजफाटा असतानाही आंदोलनकर्ते बंगल्यापर्यंत पोचले होते. त्यांना अडविण्यात पोलिस अपयशी ठरले होते. त्यामुळे पोलिस दल, गृहविभाग या घटनेला सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
राणेंच्या विरोधात काहीजण सोशल मीडियावर नको त्या कमेंट करीत आहेत. सत्तरीची जनता गप्प आहे, असा विरोधकांचा भ्रम आहे. कोण काय कमेंट करतो, त्याकडे आमचे नेहमीच लक्ष असते. सत्तरीच्या जनतेलाही सोशल मीडियाचा वापर करता येतो. प्रसंगी आम्हीही कमेंट करून सत्तरीची ताकद दाखवू, असाही इशारा यावेळी देण्यात आला.
विनोद शिंदे म्हणाले, की विश्वजीत राणे हे सरकारी गाडी, घर वापरत नाहीत. ते स्वत:च्या मालकीच्या सुविधा वापरतात. विरोधकांनी पाच-सहा किलोमीटर दूर पणजीतून चालत येत राणेंच्या बंगल्यावर धडक दिली, हे निंदनीय आहे. राणेंची तिरडी काढली हा अशोभनीय, अमानवी आणि लज्जास्पद प्रकार आहे. हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे. हे आम्ही पुन्हा खपवून घेणार नाही.
पंच संध्या खाडिलकर म्हणाल्या, विश्वजीत राणे हे नेहमीच सर्वसामान्य जनतेशी निगडित आहेत. टीसीपी कलमावरून विनाकारण राजकारण केले जात आहे. पूर्ण मंत्रिमंडळाने हा ठराव संमत केलेला असताना कुणीतरी मागील दाराने राणेंना त्रास देत आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा मानसिक छळ केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.