वाळपई: मैंगिणे-सत्तरी येथील शेतकरी रिमा रमेश मेळेकर यांच्या भाजी पिकाची गव्यांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली. दोन ते तीन महिने अथक परिश्रम घेऊन उभे केलेले आणि काढणीला आलेले पीक गव्यांच्या कळपाने काही क्षणांत उद्ध्वस्त केले. त्यामुळे मेळेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या चतुर्थीचा सण सुरू आहे. या काळात गावठी भाज्यांना मोठी मागणी असते. सणासुदीत भाजी पिकातून आर्थिक उत्पन्न मिळेल, या आशेने मेळेकर यांनी मेहनत घेऊन लागवड केली होती. पिकाची वाढही चांगली झाली होती. मात्र काढणीच्या तोंडावर गव्यांनी पिकाची नासधूस केल्याने त्यांच्या आशेवर पाणी पडले आहे. गव्यांनी भाजीसह इतर पिकांचेही नुकसान केले.
लोकवस्तीत वन्यप्राण्यांचा वावर
सत्तरी तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. आता दिवसाढवळ्या गव्यांचे कळप लोकवस्ती आणि शेतांमध्ये येऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांसाठी ही गंभीर चिंतेची बाब बनली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मागणी करूनही ठोस उपाययोजना होत नाही. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी.
गावठी भाज्यांना चतुर्थी काळात मोठी मागणी असते. या सणानिमित्त चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र काढणीला आलेले पीक गव्यांनी एका झटक्यात नष्ट केले. एवढे कष्ट करूनही शेतीचे असे नुकसान होत असेल, तर पुढे शेती कशी करायची?
- रिमा मेळेकर, शेतकरी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.