Agriculture News : कुळे: संजीवनी साखर कारखान्यात एक वर्षापूर्वी ताबा घेतलेले प्रशासक सतेज कामत यांनी कारखान्याच्या अखत्यारितील पडिक जागेचा वापर शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला.
कारखाना बंद असल्याने उपलब्ध असलेल्या कामगारांना सोबत घेऊन त्यांनी मिरची, तांबडी भाजी, मुळा, काकडी, भेंडी व अन्य भाज्यांची लागवड केली. यात यश प्राप्त झाल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या कामत यांनी आता मोठ्या प्रमाणात पीक घेण्यास सुरुवात केली आहे.
यावर्षी कामत यांनी गावठी भाज्यांसोबत दक्षिण आफ्रिकेची भेंडी, अज्युमा चिली पेपर (मिझोराम) यांची लागवड केली. मोठ्या आकाराची दक्षिण आफ्रिकेची भेंडी लागवड करून त्याचे बियाणे तयार करण्यात येणार आहे.
अज्युमा चिली पेपरची विक्री करण्यात येत आहे. अतिशय तिखट असलेली ही मिरची मिझोराम, आसाम व अन्य राज्यांत सुमारे १ हजार रुपये किलो दराने विक्री केली जाते. परंतु संजीवनी साखर कारखान्यात सध्या लहान पॅकेट तयार करून प्रायोगिक तत्त्वावर विक्री केली जात आहे.
गेल्या वर्षभरापासून कारखान्याला दरमहा सुमारे दीड लाख रुपयांचा महसूल मिळत आहे.
विक्री केंद्रालाही प्रतिसाद
या मळ्यात गावठी भाजीसह दक्षिण आफ्रिकेची भेंडी, अज्युमा चिली पेपर (मिझोराम), बाजरी आणि ज्वारी यांचे पीक घेतले जाते. लागवड केलेल्या भाजीच्या विक्रीसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला एक विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. परिसरातील लोक याठिकाणी ताजी भाजी खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांना भाजीसाठी बाजारपेठेत जावे लागत नाही. या विक्री केंद्राला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
संकटावर केली मात
कामत यांनी कामगारांच्या सहकार्याने संजीवनी साखर कारखान्याच्या जमिनीत फुलवलेला भाजीचा मळा मध्यंतरी संततधार पडणाऱ्या पावसामुळे कुजत चालला होता. त्यामुळे मळ्यातील लागवडीचे बरेच नुकसान झाले. नुकसान सोसावे लागले, तरी कामत यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा लागवडीला शेण, जीवामृत वगैरे घालून हा भाजीचा मळा उभा केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.