कैक युगे झाली तरी पश्चिम घाटाच्या नियतीत अट्टाहासाने आयुष्य वेचित सुळके समरस झाले आहेत. त्यांनी जीवन देणाऱ्या पाण्याला दूर करून कोरडेपणा स्वीकारला आहे, एकेक सुळका डोंगराप्रमाणे एकाकीपणे राहात माणसाळला आहे.सह्याद्री नावाने ओळखला जाणारा पश्चिम घाट पाहिला, म्हणजे काळाकभिन्न दिसतो. उन्हाळ्यात त्याला दुसऱ्या रंगाचा स्पर्शच दिसत नाही. उघडे बोडके सुळे तुटलेले कडे आकाशाला भिडलेले दिसतात. त्या कड्यांवर गरुड सोडून इतर पक्षी, पाखरे बसण्यास धजावणार नाहीत, असा त्यांचा व्यासमुनींच्या रुपा-प्रमाणे भयभीत चेहरा.
त्या सुळक्यांवर ऊन पडते, वारा झोंबतो आणि पावसाळा सुरू झाला म्हणजे त्यांच्यावर पाणी पडून ते घसरून वज्राप्रमाणे पायथ्याशी धाव घेते, असा त्या काळ्या सुळक्यांचा न्यारा थाट. पाऊस पडून महिनाभरांत ते हिरव्या शेवाळ-भस्माचा लेप लेवून सौंदर्याने नटतात.
त्यांच्यावर मुठभर गवत रुजण्याची शक्यता नाही, हे त्यांचे सारे कडकडीत, धगधगीत तपाचे व्रत असावे, त्यांच्या वरून वाहणारे पाणी पायथ्याकडून ओहोळ, नद्या बनून जात समुद्राला मिळते. ते कधी लडीवाळपणे वाहत नाही, झपाटल्यागत घोंगावत धावते. सह्याद्रीचे हे कडे जन्मजात अज्ञात कठोरपणा घेऊन जन्मास आले आहेत.कैक युगे झाली तरी पश्चिम घाटाच्या नियतीत अट्टाहासाने आयुष्य वेचित सुळके समरस झाले आहेत.
त्यांनी जीवन देणाऱ्या पाण्याला दूर करून कोरडेपणा स्वीकारला आहे, एकेक सुळका डोंगराप्रमाणे एकाकीपणे राहात माणसाळला आहे. त्यांचे दगड गोटे म्हणजे अचल पाषाणाचे तुकडे, वहाणाऱ्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने ते तुटून फुटून पाण्याच्या प्रवाहाबरोबर एकत्र होत नदी पात्रात वानर सेनेचे रुप घेतल्याप्रमाणे डुंबून पहाताना दिसतात. पात्रातील पाणी कमी होताच जागच्या जागी ते स्थिर राहतात,
वास्तविक घाटाच्या सुळक्यावर माणसांचा ठाव ठिकाणा नसतो, पण पाषाणाशी सलगी करणारा रानमाणूस अज्ञेयाच्या प्रेरणेने पछाडून गेला की, या सुळक्यावर सहज चढून जातो. पश्चिम घाटातील कळसूबाईचा सुळका सर्वात उंच शिखर, पावसाळ्यात त्याच्या वरून पाण्याचे लोट वहात खाली येतात, पण महेश्वराच्या साक्षात्काराची आस लागलेल्या अध्यात्मवाद्याला त्याची ओढ लागली की, ते उंच शिखर चढून जातात.
पूर्वकाळी काही कळसूबाई त्या शिखरावरील महेश्वराला वेडावली आणि शिवस्मरणाच्या धुंदीत चढून त्या शिवाची भेट घेऊन शिखराशी एकरुप झाली. त्याने मानवाची नियती डोंगरात आणि डोंगराची विश्वधारेत विलीन होऊन गेली. तशाच प्रकारचा दुसरा सुळका ठाण्यातल्या जंगलात आहे, कोळ्या वारल्यांचे महालक्ष्मी स्थान तिथल्या दुर्गम सुळक्यावर आहे. तिथे जाणे म्हणजे संकटात सापडणे, पण देवीच्या जत्रे-दिवशी तिथल्या आदिवासी भक्तांच्या अंगात देवी संचारली, की ते रात्रीचे माकडाप्रमाणे चढून शिखर सर करतात,
आणि देवीची पूजा करून खाली येतात, अशाच प्रकारे महाबळेश्वर, अन्नामलाई, अगस्त्य-मलाई, वृषभनाद, म्हादई अरण्यात, वाघेरी, मोर्लेगड, सोसोगड या ठिकाणी जाताना चालण्याची शक्ती पणाला लावावी लागते. आपल्यातील काही माणसांनी प्राकृतिक उपास्य-दैवते सोडून, गौतम-बुद्धाच्या शांती अहिंसेचा मार्ग पत्करून त्या धर्माचा उपदेश घेऊन युगांच्या कठोर तपस्येत त्या सह्याद्री-पुत्रांना जीवनाच्या तालाचे भान समजले.
वैरागी जीवनाचे व्रत घेतलेल्या बुद्धानुयानांना खोदकामासाठी सह्याद्री रांगांच्या कुशीत खोदकामासाठी अत्यंत अनुरुप कातळ सापडले. उत्साहित त्या काळ्या दगडांत अजब कलेची शिल्पे उभारून, अजिंठा, वेरूळ लेणी निर्माण करून जगाला अजोड आणि अमर भेट दिलेली पहावयास मिळते. ती कला त्यांना वैराग्यामुळे प्रसन्न झाली, ती शांतीची स्मारके सह्याद्री लाडाने आपल्या अंगाखांद्यावर खेळवत बागडत आहे.
आज ते कलेचे विश्व म्हणून शिल्लक राहिले, त्या कलेच्या घडणीची मिरास एकाही सामान्य माणसाने पुढे चालू दिली नाही. पूर्वी घरांच्या भिंती उत्सवावेळी सफेद मातीने सजवायचे. पश्चिम घाटातील गोदावरी, कृष्णा, कोयना, चंद्रभागा, गोव्याच्या तेरेखोल, शापोरा, मांडवी, जुवारी, तळपण, गालजीबाग पश्चिम, दक्षिण दिशांनी सागराला मिळतात, पावसाळ्यात त्या काठोकाठ भरून दऱ्याखोऱ्यांतून वाजत, गाजत, उड्या मारत वाहतात.
मात्र, उन्हाळा येताच काही ठिकाणच्या नद्यांच्या काठावरील गावांना चुळभर पाणी मिळत नाही, एखाद्या खोलगट ठिकाणी तांब्याने पाणी भरून घागर भरावी लागते. पावसाळ्यातील पाण्याने नद्या वसुंधरेचे आणि जैवविविधतेचे जीवन फुलवत असतात. नद्यांच्या प्रवाह सपाट मैदानी भागात पोहचताच पात्र रुंदावल्याने संथ होतो. भोवरे लेझीम खेळणाऱ्या पुरुषांप्रमाणे खळखळ आवाज देणारे पाणी संथगतीने हलत, डुलत, मंद वाहते. संत ज्ञानेश्वरांनी जात, पात, अस्पृश्य, शुद्र हे सारे भेद मोडून अमृताच्या बोलांनी आध्यात्माच्या गाभ्यालाच हात घालून सर्व संकेत मोडून टाकले. तसेच पाणी हे सर्वसमान आहे.
अहंकाराबरोबर आत्मसमर्पणाचे वेड आणि सुख शेवटपर्यंत मुक्त मनाने भोगणे अशक्य आहे, पश्चिम घाट जंगलातील झोपडीत राहणाऱ्याने लग्न समारंभावेळी सजावटीसाठी भिंतीवर मातीने कोरड्या हंगामात टेकडीवर दिसणारी दृश्ये चित्रात रेखाटली. ती केवळ रेखामय पर्णहीन झाडांची, दातोऱ्या मानवाची, नाग फण्याची, गोलाकार, त्रिकोणी, चौकोनी सरळ बारीक रेषा घालून, पिठाने कलाकृती चित्रांच्या रांगोळ्या दरवाजा
आणि तुळशी समोर रांगोळी रंगविली होती. जंगलातील झाडाबरोबर चिंच, कडुलिंब, लिंबाची झाडे काढून दोन हातांनी त्यांची जोपासना केली. तहान एकाची, व्रत दुसऱ्याचे अशी तडजोड केली नाही, संत ज्ञानेश्वरांनी लोकांसाठी ज्ञानेश्वरी लिहिली आणि अवघ्या एकविसाव्या वर्षी स्वतः समाधी घेतली. ते अहंकाराशी सतत झगडत राहिले, त्यांची नजर सदा उंच राहिली. इंद्रायणी आणि गोदावरी नद्यांचे अमृतमय पाणी पिऊन संघर्ष करीत गिरनार शिखरासारखे ते जीवन जगले, हे आज २१ वे शतकही सांगते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.