पणजी: उन्हाळ्याच्या आगमनासोबतच पणजी बाजारपेठेत रानमेवांची रेलचेल पाहायला मिळत आहे. स्थानिक फळांचा आणि भाज्यांचा सुगंध दरवळत असून, बाजारपेठा रंगीबेरंगी फळांनी फुलून गेली आहे.
दर वर्षीप्रमाणे यंदाही करवंद, जांभूळ, चुन्ना, ओले काजू, कैऱ्या आणि आंब्यांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही फळे उन्हाळ्याच्या हंगामातच मिळणारी असल्याने दर थोडेसे जास्त असूनही ग्राहक ती आवर्जून खरेदी करत आहेत.
करवंद आणि जांभूळ यासारखी फळे केवळ चविष्ट नसून, शरीरासाठी थंडावा देणारी आणि औषधी गुणधर्म असलेली मानली जातात. बाजारात सध्या करवंद आणि जांभूळ ५० रुपये वाट्याने विकले जात आहेत.
चुन्ना हे छोटे, आंबट-गोड फळ २० रुपये वाट्यानं मिळत आहे. ओले काजूगार २५० रुपये दरशे या दराने विकले जात असून, याचा उपयोग काजूकरीसारख्या लोकप्रिय पारंपरिक पदार्थांमध्ये होतो.
पणजी बाजारात सध्या मानकुराद आंब्याचे दर डझनला १००० ते २५०० रुपये इतके आहेत, तर हापूस आंबा ५०० ते ८०० रुपये डझन दराने उपलब्ध आहे. तोतापुरी आणि पायरी आंब्यांनाही मागणी असून, त्यांचे दर अनुक्रमे १५०-२०० रुपये डझन आणि २५० रुपये किलो आहेत.
फणसाचे दर आकारानुसार १५० ते ५०० रुपये दरम्यान असून, नीरफणस म्हणजेच कच्च्या फणसाचे दर १०० ते २५० रुपये दराने विकले जात आहेत. गोड चव आणि पौष्टिकतेमुळे या फळांची मोठी खरेदी होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.