म्हापसा: पिर्ण गावात जीएसटी उत्सव कार्यक्रमावेळी आरजीपीचे नेते मनोज परब व इतर कार्यकर्त्यांनी बेकायदा जमाव करून लोकांना चिथावल्याचा आरोप कोलवाळ पोलिसांत दाखल झाला आहे. या प्रकरणी परब यांच्यासह सुबोध कांदोळकर, सिप्रियानो परेरा, अंकुश पार्सेकर, सीताराम सातार्डेकर, संजय देसाई, रोहन कळंगुटकर आदींवर गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनी सर्वांना ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता स्थानकात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार सर्वांनी चौकशीसाठी हजेरी लावत जबाब नोंदविला. माध्यमांशी बोलताना मनोज परब म्हणाले, “आम्ही लोकप्रतिनिधींना फक्त प्रश्न विचारले. गावातील रस्ते रुंदीकरणामुळे ग्रामस्थ भयभीत आहेत. ग्रामसभेत माहिती न दिल्याने आम्ही मंत्र्यांना विचारणा केली. मात्र सरकार आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दडपशाही करत आहे. आरजीपी सत्याच्या बाजूने लढत राहील.”
मुळात आम्ही लोकप्रतिनिधींना केवळ प्रश्न विचारले. यापूर्वी माझ्यावर व आरजीपीच्या कार्यकर्त्यांवर अनेक खोटे गुन्हे दाखल झालेत. मात्र, न्यायालयातून (Court) आम्हाला न्याय मिळाला आहे. त्यामुळे आमदारांनी आरजीपीला कायद्याची भीती दाखवू नये. आरजीपीचा लढा हा सत्याच्या बाजूने असतो, असेही परब म्हणाले.
आमदार विजय सरदेसाई यांच्यासोबत आरजीपीची राजकीय जवळीक वाढल्याचे दिसते, असा प्रश्न माध्यमांनी केला असता मनोज परब उत्तरले की, आम्ही गोमंतकीयांसाठी वावरतोय. काल सोमवारी मोपा येथे टॅक्सीकरांच्या आंदोलनावेळी आम्ही एकत्र होतो. कारण मुद्दा स्थानिकांचा होता. त्यात राजकारण नव्हते. राहिला प्रश्न, भविष्याचा तर जो पक्ष आमच्या विचारधारांचा, पोगो बिल किंवा गोव्यातील (Goa) जमिनींचे संरक्षण करण्याबाबत झगडणारा पक्ष असेल, त्यांच्यासोबत आरजीपी काम करण्याबाबत विचार करु शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.