सासष्टी: राज्यात पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये मशागतीची कामे सुरू केली आहेत. तसेच भात लागवडीसाठी बियाणे रुजत घालण्याची तयारी सुरू आहे. परंतु खत व बियाण्यांची कमतरता आणि दरवाढीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. खत तसेच बियाण्यांच्या पुरवठ्यात घट झाल्याने खत व बियाणे विक्रेत्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
यासंदर्भात केपे येथील खत विक्रेते अजय दुकळे यांनी सांगितले की, खतांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. शिवाय खताचा पुरवठा घटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच आम्हालाही काय करावे हे सुचत नाही. दरवाढ झाल्याने खताची मागणी कमी झाल्याचे दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले.
दुकळे यांनी सांगितले की, ‘संपूर्णा’ या खताचा दर २,०२५ रुपये प्रति बॅग होता. तो मध्यंतरी २,३०० रुपये झाला आणि आता आम्हाला तो २,५०० रुपये प्रति बॅग दराने विकावा लागत आहे. एनपीके १९:१९:१९ व एनपीके १५:१५:१५ या दोन प्रकारच्या खतांचा पुरवठा होताना दिसत नाही. एनपीके १९:१९:१९ खताच्या ५० कि.ग्रॅ. वजनाच्या पोत्याचा दर १,८०० रुपये होता.
तो आता २,००० रुपये झाला आहे. कडूलिंबाच्या खताचा दर ७३० रुपयांवरून ७७० रुपये प्रति पोते इतका झाला आहे. पॉटॅश व अन्नपूर्णा खतांच्या दरांतही वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीकडून खताचा पुरवठा व्यवस्थित होत होता. यंदा सरकारने या कंपनीला गोव्यात कार्यालय सुरू करण्यास सांगितले.
त्याशिवाय विक्रेत्यांना खताचा पुरवठा करता येणार नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. कंपनीने गोव्यात कार्यालय व गोदाम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्याला थोडा विलंब होणार असल्याचे कंपनीतर्फे सरकारला कळविण्यात आले. तोपर्यंत पुरवठा करण्याची परवानगी द्यावी, अशी सरकारकडे विनंती करण्यात आली.
मात्र, सरकारतर्फे अद्याप प्रतिसाद मिळालेला नसल्याचे कळते, अशी माहिती दुकळे यांनी दिली.
खतांच्या दरवाढीचे व कमी पुरवठ्याचे मुख्य कारण आखाती देशांत सुरू असलेले युद्ध असल्याचे सांगितले जात आहे. कच्च्या मालाचा पुरवठा घटल्याने खत उत्पादनात घट झाली आहे. तरीही शेतीवर परिणाम होऊ नये यासाठी सरकार खबरदारीची पावले उचलत असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
खताच्या किंमतीत वाढ झाल्याने व पुरवठा कमी होत असल्याने यंदा गोव्यातील भात पिकावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे शेतकरी आधीच गोंधळलेल्या अवस्थेत आहे.
खतांची दरवाढ व कमी पुरवठ्याच्या संदर्भात सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. मजुरीचे दरही वाढलेले आहेत. शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करतात; मात्र त्यांना योग्य परतावा मिळत नाही. यंदाची परिस्थिती गंभीर असून, छोटे शेतकरी दबावाखाली आहेत.
खतांचे वाढलेले दर व कमी पुरवठ्याची स्थिती अशीच राहिली, तर शेतकऱ्यांना यंदा भाताची लागवड मोठ्या प्रमाणात करणे शक्य होणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.