

पणजी: राज्यात खरीप हंगामात होणारे भाजीचे उत्पादन आणि भाजी लागवडीच्या क्षेत्रातही २०२३ आणि २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये घट झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिसून येते.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. २०२३ ते २०२५ या तीन वर्षांच्या काळात राज्यात खरीप हंगामात किती हेक्टर क्षेत्रात भाज्यांची लागवड करण्यात आली आणि त्यातून किती उत्पादन मिळाले, असा प्रश्न आमदार शेट यांनी विचारला होता.
त्यावरील उत्तरात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जी आकडेवारी सादर केली आहे, त्यात २०२३ मध्ये ३,१०४ हेक्टर जमिनीत भाज्यांची लागवड करण्यात आली होती. त्यातून ३२,९६१ टन भाज्या मिळाल्या होत्या. २०२४ मध्ये ३,१६५ हेक्टरमध्ये भाज्यांची लागवड करण्यात आली.
भाज्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार कोणकोणत्या उपाययोजना राबवत आहे, असाही प्रश्न आमदार शेट यांनी विचारला होता. त्यावर अधिकाधिक तरुणांनी कृषी क्षेत्रात कार्यरत होऊन भाज्यांची लागवड करावी, यासाठी फलोत्पादन महामंडळामार्फत विविध योजना राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात येत आहे. भाजीपाला लागवडीसाठी शेतकऱ्यांना पुरेसे पाणी तसेच पिकाच्या संरक्षणासाठी कुंपण उभारण्यास आर्थिक मदत देण्यात येते, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.
राज्यात कोणकोणत्या भाज्यांचे अधिक उत्पादन घेण्यात येते, या प्रश्नाच्या उत्तरात राज्यात कारली, भेंडी, दुधी भोपळा, वांगी, मिरची, गवार, कोथिंबीर, काकडी, भोपळा, मुळा, दोडका, वाल, पालक, मेथी, शेपू, पडवळ, नवलकोल आदी भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.