पणजी: ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत राजधानी पणजीसह आसपासच्या परिसरात गेले काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचा फटका सामान्य नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांनाही बसू लागला आहे. दरम्यान, परराज्यांतून वीज आयात प्रमाण कमी होत असल्याने हे लोडशेडिंग (भारनियमन) सुरू आहे, अशी माहिती वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
गेल्या आठवड्यापासून तापमानात खूपच वाढ झाल्याने घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी विजेचा ताण अधिक जाणवत आहे. सध्या सरासरी तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. त्यामुळे एसी, पंखे व कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी काही भागात आलटून पालटून वीजप्रवाह बंद करण्याची कसरत करावी लागतेय.
कोल्ड स्टोअर्स, आयटी ऑफिसेस, मेडिकल दुकाने आणि इस्पितळांना त्याचा मोठा फटका बसत आहे. उद्योजकांनी भाडेपट्टीवर जनरेटर आणून व्यवसाय सुरू ठेवावा लागतोय. आधीच वीजबिले भरमसाठ येत असताना होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या लोडशेडिंगसंदर्भात वीज खात्याकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र राज्याला कमी प्रमाणात होणारा वीजपुरवठा व वाढलेला ताण यावर उपाय व पर्याय काढण्यासाठी हा मध्यमार्ग काढण्यात आला आहे. वीजवाहिन्या तसेच उपकरणांच्या दुरुस्तीची कामे, वीजपुरवठ्यात अडथळे आणि ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड यामुळे वीज खंडित होत असल्याची माहिती सूत्राने दिली. या समस्येवर पर्याय काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पणजी, सांताक्रुझ व ताळगाव परिसरात गेल्या सोमवारपासून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज खात्याने अद्याप अधिकृतपणे लोडशेडिंग जाहीर केले नसले तरी त्याचाच हा भाग असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अनेक ठिकाणी दरदिवशी दोन ते तीन वेळा अर्धा ते एक तास वीज गायब होत असल्यामुळे लोकांसह व्यापाऱ्यांना उकाड्यामुळे बाहेर येऊन उभे राहावे लागते. शिवाय कामे अडून राहतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.