फोंडा: मराठीसाठी आता निर्णायक आरपारची लढाई उभारण्याची गरज असून मराठीला गोव्याची राजभाषा करायची असेल, तर मराठी भाषकांची मतपेढी निर्माण करून सत्ताधारी आणि इतर राजकीय पक्षांना जेरीस आणू व मराठीला राजभाषेचे स्थान न देणाऱ्यांना मतदान करणार नाही हे मराठीप्रेमींनी ठामपणे ठरवावे.
मराठी भाषकांची मतपेढी निर्माण करून सरकारला कोंडीत पकडू आणि मराठीला मानाचे स्थान मिळवून देऊ, असा निर्धार मराठी राजभाषा समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केला.
फर्मागुढी येथील गोपाळ गणपती सभागृहात आज रविवारी झालेल्या मराठी राजभाषा निर्धार समितीच्या फोंडा कार्यकर्ता प्रखंड मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाणुदास सावंत, जयंत मिरिंगकर, दिवाकर शिंक्रे, विनोद पोकळे, उदय डांगी, अशोक नाईक, हनुमंत नाईक, शशांक उपाध्ये, दिव्या मावजेकर व इतर मराठीप्रेमी उपस्थित होते.
सुभाष वेलिंगकर म्हणाले, की मराठीच्या या निर्णायक लढ्यात नियोजन महत्त्वाचे असून विधानसभा निवडणुकीसाठी दोन वर्षे शिल्लक आहेत आणि हा काळ फार महत्त्वाचा आहे.
मराठीप्रेमी आणि मराठी कार्यकर्त्यांना सबंध गोवाभर पोचायचे असून तालुका पातळीवर, पंचायत पातळीवर आणि ग्राम पातळीवर विविध समित्या स्थापन करून मराठी राजभाषेचा हा प्रश्न सर्वांपर्यंत पोचवायला हवा. हे काम येत्या ऑगस्टपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असून मराठीप्रेमींची ही कसोटी असून त्यासाठी मराठीप्रेमींनी मनात दृढ निश्चय करायला हवा आणि मैदानात उतरण्याची तयारी सर्वांनी ठेवावी.
मराठी भाषकांच्या मतपेढीची सरकारने किंवा इतर राजकीय पक्षांनी धास्ती घ्यायला हवी. प्रसंगी सत्ताधाऱ्यांना उलथवून टाकण्याची शक्ती मराठीप्रेमींनी बाळगावी.
यावेळी शाणुदास सावंत यांनी मराठीसाठी निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली असून सर्वांनी तयारीत रहावे, असे सांगितले. शशांक उपाध्ये तसेच दिव्या मावजेकर यांनीही मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे असे नमूद केले. स्वागत हनुमंत नाईक यांनी, प्रास्ताविक जयंत मिरिंगकर यांनी, तर मच्छिंद्र च्यारी यांनी सूत्रसंचालन केले.
गो. रा. ढवळीकर म्हणाले, की आमचा कोकणीला विरोध नाही, पण कोकणीबरोबरच मराठीलाही मानाचे स्थान मिळावे हीच मराठीप्रेमींची मनीषा आहे. मराठी हा गोमंतकीयांचा श्वास आणि ध्यास आहे. आमचा लढा कोकणीच्या विरोधात नाही, तर कोकणीबरोबरच मराठीला राजभाषेचा मुकुट परिधान करण्याचा आहे. राज्यात चालत नसलेले एकच कोकणी वर्तमानपत्र असताना कोकणीला राजभाषेचा सन्मान मिळतो, याशिवाय राज्यात सर्वाधिक निवेदने, पत्रे ही मराठीतून सरकारला पाठवली जातात तरीही मराठीला डावलले जाते हे योग्य नाही. त्यामुळे आता मैदानातच उतरायला हवे. त्यासाठी मराठीप्रेमींनी तयार रहावे.
या प्रखंड मेळाव्याला मराठीप्रेमींची प्रचंड उपस्थिती लाभली. हा मेळावा नव्हे हा महामेळावा आहे, असे सुभाष वेलिंगकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.