‘फॉर्म्युला फोर’ या रेसिंग स्पर्धेमुळे पेडण्यातील अंतर्गत राजकारणाला गती मिळाली आहे. याला कोणाचे समर्थन व विरोध कोणाचा यावर जनतेची नजर आहे. अशा प्रकल्पांसाठी पेडण्याचीच आठवण का होते अशी विचारणा होऊ लागली आहे.तुये येथील इलेक्ट्रॉनिक्स सीटीसाठी लागणाऱ्या रस्त्यासाठी केलेल भू संपादन रद्द झाले तरी त्याकडे कोणाचे लक्ष नाही मात्र या रेसिंगसाठी कोट्यवधी खर्च होणार असल्याने त्याकडे अनेकांचे लक्ष लागले अशी खोचक चर्चा ऐकू येत आहे. विमानतळ आला पण रोजगार मिळाला नाही, आयुर्वेद इस्पितळ आले पण रोजगार दूरच राहिला त्या पद्धतीने अशा अनेक प्रकल्पांचे होणार असे बोलले जात आहे. त्यामुळे पेडण्यातच ही रेसिंग का, जमीन मोठ्या प्रमाणात केप्यात, सांग्यात का नेत नाही असा प्रश्न चर्चेत आला आहे. ∙∙∙
बार्देश तालुक्यात डोंगर गायब झाला, की डोंगर कापलाच नाही? असी खमंग चर्चा सुरू आहे. न्यायालयात सादर झालेले फोटो म्हणतात, येथे डोंगर होता आणि आता कापला जातो. पण जेव्हा न्यायालयाने उपनगरनियोजकांना हजर राहायला सांगितले, तेव्हा उपनगर नियोजकांनी सांगितले, येथे डोंगरच नव्हता, मग कापणी कसली? आता प्रश्न असा की, फोटो खोटे बोलतात, की डोंगराने स्वतःहून ट्रान्स्फर घेतली? स्थानिकांमध्ये तर चर्चा रंगलीये डोंगर जर नव्हताच, तर फोटोमध्ये दिसतोय, तो मग काय? थ्रीडी वॉलपेपर? गंमतीची गोष्ट म्हणजे हळदणकर साहेबांनी प्रतिज्ञापत्र द्यायलाही होकार दिला आहे. म्हणजे आता मामला सरळ ‘तो मी नव्हेच!’ मोडमध्ये दिसतोय. आता खरं कोण आणि खोटं कोण हे न्यायालयच ठरवणार, पण तोपर्यंत ‘डोंगर होता की नव्हता’ची चर्चा सुरूच राहाणार आहे. ∙∙∙
फोंड्याचे पात्रांव नसल्याने सध्या तरी फोंड्याला वाली नसल्यागत स्थिती आहे. वास्तविक रवी नाईक यांच्या निधनानंतर खरे म्हणजे लगेच दोन ते तीन महिन्यात पोटनिवडणूक अपेक्षित होती, पण पाच महिने उलटून गेले तरी अजून ही पोटनिवडणूक होत नाही. त्यामुळे फोंड्याला सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. अजून पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही, त्यामुळे आणखी काय बोलायचे, असा सवाल खुद्द सत्ताधाऱ्या कार्यकर्त्यांकडूनच होत आहे. ∙∙∙
फोंडा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार हे ठरून गेलेले आहे. ती निवडणूक जवळ येत चालली आहे, तसे फोंड्यात गट तटाचे राजकारणही उफाळून येऊ लागले आहे. कोणाच्या नजरेस पडू नये, अशी काळजी घेत समीकरणे जुळवली जात आहेत. सध्या डॉ. केतन भाटीकर हे मगोतून फुटून बाहेर पडल्यावर त्यांची भूमिका काय? यावर बरेच काही अवलंबून आहे. ते कॉंग्रेसकडे झुकतील असे काहींना वाटत होते. त्यांनीही तसेच संकेत दिले होते. मात्र भाटीकर यांच्यासोबत फोंड्यातील भाजपचे मूळ कार्यकर्ते उभे राहतील असे दिसू लागले आहे. त्यामुळे भाटीकर यांची कॉंग्रेसकडे झुकणारी नौका आता भाजपकडे आकृष्ट होऊ शकते. उद्या भाजपने अन्य कोणाला उमेदवारी दिली, तरी हे कार्यकर्ते भाटीकर यांच्यासोबतच राहतील काय ? यावर बरेच काही अवलंबून आहे. भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी भूमिका घेणेही फोंड्यात महत्वाचे ठरणार अशी चर्चा आहे. ∙∙∙
रोजगारानिमित्त पोर्तुगाल आणि इतर देशांत स्थायिक झालेल्या गोमंतकीयांना दुहेरी नागरिकत्व देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले आहे. याबाबत सरदेसाईंनी अनेकदा ही मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली होती. परंतु, त्यांच्याकडून मागणी पूर्ण होत नसल्याने सरदेसाईंनी आता थेट मोदींना हाक दिलेली आहे. सरदेसाईंच्या या पत्राची मोदी दखल घेणार? की राज्यातून जाणाऱ्या पत्रांना पंतप्रधान कार्यालय जसे स्थान देते, तसेच स्थान सरदेसाईंच्या पत्राला मिळणार? याकडे विदेशातील गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙
गोव्यात समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात युती करावी की नाही, याबद्दल काँग्रेसमध्ये दोन प्रवाह आहेत. यावर काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या कार्यालयात बराच खल झाला. काँग्रेसचे आमदार युरी, एल्टन हे युती हवी म्हणत असताना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर या विषयावर फारसे भाष्य करत नाहीत. याबद्दल पत्रकारांनी काल एल्टन डिकॉस्टा यांना छेडले असता, जे जिंकून येतात त्यांचे विचार वेगळे असतात, पाटकर जिंकून आले असते, तर त्यांचेही विचार आमच्या सारखेच झाले असते, असे ते म्हणाले. यावर काँग्रेस विधिमंडळ पक्ष आणि प्रदेश समिती यांच्यात एकवाक्यता नाही का? असे पत्रकारांनी विचारले असता, युरी आलेमाव यांनी हस्तक्षेप करत ‘ऑल इज वेल’ असे म्हटले. खरेच काँग्रेसमध्ये सर्व ‘वेल’ आहे का? ∙∙∙
मडगावातील घोगळ गृहनिर्माण वसाहतींतील ‘मशिद’ या दिवसात चर्चेत आहे. तेथे झालेल्या एका खुनाच्या घटनेनंतर तिला जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सील ठोकले गेलेले आहे. पण सध्या केवळ तीच नव्हे, तर गेल्या तीनेक दशकांत मडगावात चारही बाजूने उभ्या ठाकलेल्या मशिदी लोकांच्या चर्चेत आहेत. ऐशी- नव्वदच्या दशकांत म्हणे मालभाट तसेच शिरवडे अशा दोनच मशिदी होत्या, पण त्यानंतर शहराच्या चारही बाजूंनी मशिदींची संख्या वाढली. तरीही प्रश्न नव्हता, पण या धार्मिक वास्तूंत त्याच लोकांमध्ये सतत वाद होताना व त्यामुळे अशांतता पातळताना दिसते. त्यामुळे पोलिस यंत्रणा मात्र सतत दडपणात राहू लागली आहे. सध्या ज्या मशिदीचा मुद्दा उपस्थित झाला आहे, ती तर निवासी वसाहतीत आहे. तिच्या बाजूने शैक्षणिक संस्था आहे. त्यामुळे वेगळीच समस्या तयार झालेली असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.