मडगाव: जिल्हा पंचायत निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्यानंतर गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी आत्मचिंतनाची गरज व्यक्त केली. "काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची युती निवडणुकीच्या अगदी तोंडावर झाल्यामुळे ती तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आणि नेत्यांपर्यंत पोहोचू शकली नाही," अशी कबुली त्यांनी दिली. किमान चार जागांची अपेक्षा असताना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केलीये.
विजय सरदेसाई यांनी माहिती दिली की, गोवा फॉरवर्डने ९ जागा लढवल्या आणि ३०,५०० मते मिळवली, जी एकूण मतदानाच्या २७ टक्के आहेत. एका जागेवर तर पक्षाचा उमेदवार केवळ १९ मतांच्या निसटत्या फरकाने पराभूत झाला. सासष्टी तालुक्यातील निकालांवर समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की, "सासष्टीतील जनतेने भाजपला नाकारता येते हे दाखवून दिले, मात्र उर्वरित गोव्यात मतदारांची मानसिकता वेगळी असल्याचे दिसून आले."
युती असूनही काही मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले नसल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. "राय मतदारसंघात पीसीसी (PCC) सदस्यांनी उघडपणे गोवा फॉरवर्डच्या उमेदवाराविरोधात काम केले. काणकोणमध्ये बंडखोर उमेदवाराने १,२०० मते घेतल्याने पक्षाला फटका बसला, तर कुंभारजुवे येथे मतांच्या विभाजनामुळे पराभव झाला," असे त्यांनी स्पष्ट केले.
या निकालांमधून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे सांगत सरदेसाई म्हणाले की, जर ही युती सहा महिने आधी झाली असती, तर दक्षिण गोव्यातील चित्र पूर्णपणे वेगळे असते. आता सर्व मित्रपक्षांनी एकत्र बसून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ठोस रणनीती आखण्याची वेळ आली आहे. झालेल्या चुका सुधारून भविष्यात अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.