Tiswadi Dam Dainik Gomantak
गोवा

Tiswadi News: तिसवाडीतल्या नवीन बांधांची स्थिती दयनीय; अनेक नविन बांधांना भेगा

Tiswadi Dam: पारंपरिक पद्धतीचे बांध हे शाश्वत आणि टिकाऊ

गोमन्तक डिजिटल टीम

नदीचे पाणी खाजन शेतीत शिरणार नाही यासाठी पूर्वजांनी नैसर्गिक पद्धतीने बांध बांधण्याची व्यवस्था केली होती; परंतु कालांतराने ही प्रक्रिया नष्ट होण्याच्या मार्गावर असून तिची जागा आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधलेले बांध जास्त काळ टिकत नसल्याने पारंपरिक पद्धतीचे बांध हे शाश्वत आणि टिकाऊ होते, हे तिसवाडीत बांधलेल्या नवीन बांधांची झालेली दयनीय स्थिती पाहून दिसून येते.

पारंपरिकरीत्या बांध हे नदीच्या पात्रातून चिखलाद्वारे बांधले जायचे. पावसात जेव्हा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हायची, तेव्हा चिखल वाहून गेल्याने बांधाचे दुरुस्ती काम केले जायचे. या प्रक्रियेला ‘थर कुपटो’ असे म्हणत. यात बांधावर चिखलाचा अतिरिक्त थर घालून बांध पूर्ववत केला जायचा. बांधात जेव्हा छिद्र पडायचे त्यावेळी दुरुस्त करण्यासाठी चिखल आणि तणांचा वापर करून हे काम केले जात होते.

चिखल आणि तण एकत्र केल्याने बांधाला मजबुती यायची. अशी साधी, सरळ आणि स्वस्त प्रक्रिया वापरून बांधलेले बांध वर्षानुवर्षे टिकून राहिले. मुख्य म्हणजे हे नदीच्या पाण्याचा दाब सहन करायचे. आज माती आणि काँक्रिट घालून बांधण्यात येणाऱ्या बांधांना १ किंवा २ दोन वर्षे, अनेकदा सहा महिन्यांच्या आतच भेगा पडतात. पाण्याचा दाब सहन न करता आल्याने असे होते असल्याची कारणे दिली जातात.

तिसवाडी तालुक्यात गोव्यातील आकाराने मोठी असेलेली दोन खाजने कुंभारजुवे आणि नेवरा येथे आहेत; परंतु दोन्ही खाजनांची स्थिती गेल्या दोन दशकांत दयनीय झाली आहे. यात बांधांना भगदाड पडून नदीचे खारे पाणी शेतात आले आहे. बरीच वर्षे याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक ठिकाणी बांधच राहिलेले नसून शेती असलेल्या ठिकाणी नदीचे पाणी आणि खारफुटी दिसतात.

त्यामुळे कधी काळी येथे शेतजमीन होती की नाही, हा प्रश्‍न पडतो. यावर उपाययोजना म्हणून आधुनिक पद्धतीने बांध बांधले गेले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही बांध टिकत नसल्याने खाजन शेती पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकार गंभीर नसल्याची टीका शेतकऱ्यांकडून केली जाते.

मासेमारीसाठी मानसीची दारे ठेवतात उघडी

पाण्याचा दाब वाढण्यामागे मानसीची दारे उघडी ठेवत असल्याचे आरोप झाले आहेत. अतिरिक्त पाणी आत घेतल्याने दाब वाढतो. मासेमारीसाठी मानस ठेकेदार हा प्रकार करत असल्याची माहिती समोर आली होती. तिसवाडीत हा प्रकार होत असल्याने तिसवाडी मामलेदारांनी अखेर मानस ठेकेदारांना नोटीस पाठविली होती.

अनेक बांधांना पडल्या भेगा

नेवरा ओ ग्रांद खाजन हा चर्चेचा विषय ठरला असून येथे बांधण्यात आलेल्या बांधाला अनेकदा भेगा पडल्या आहेत. सुमारे ९ कोटी रुपये खर्च करून बांध बांधण्यात आला होता. तसेच आजोशीतील सेंट मॅथ्यूज खाजन बांध अनेकदा वाहून गेल्याने सुमारे १ कोटी रुपये खर्च करून पुन्हा बांधला जात आहे. त्याशिवाय करमळीतील कुव्हाळ-कातोर बांध सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून बांधला होता; परंतु तोदेखील सहा महिन्यांतच कोसळला तसेच धाडो बांधालादेखील भेगा पडल्या आहेत.

प्रक्रिया संपण्यास टेनंट संघटना जबाबदार

पारंपरिक बांध बांधण्याची प्रक्रिया संपण्याच्या मार्गावर असून यासाठी टेनंट संघटना जबाबदार असल्याचे आरोप झाले आहेत. पोर्तुगीज येण्यापूर्वीपासून ही प्रक्रिया सुरू होती; परंतु नवीन सदस्य आल्यानंतर त्यांनी निधी देणे बंद केले, त्यामुळे कालांतराने ही प्रक्रिया कमी होत गेली.

राजेश नाईक, पंचसदस्य, करमळी

आधुनिक पद्धतीने बांधलेले बांध टिकत नाहीत; कारण केवळ माती आणि काँक्रिटमुळे ते नदीच्या पाण्याच्या दाब तोलू शकत नाहीत. सरकारने पारंपरिक पद्धतीने बांध बांधावेत; कारण आमच्या पूर्वजांनी नैसर्गिक प्रक्रिया वापरून ते बांधले होते. पारंपरिक प्रक्रियेला प्रोत्साहन देऊन याचा अभ्यासक्रमातही समावेश करण्यात यावा. जेणेकरून ही पद्धत नवीन अभियंत्यांना शिकता येईल.

सांतान फर्नांडिस, शेतकरी, कुडतरी

आधुनिक तंत्रज्ञान जोपर्यंत पारंपरिक तंत्रज्ञानाबरोबर जोडले जात नाही, तोपर्यंत बांध शाश्वत राहणार नाही. आधुनिक तंत्रज्ञान शिकलेले अभियंते हे काही शेतकरी नसल्याने गोव्यातील खाजन जमिनीसंदर्भात त्यांना जास्त माहिती नसते. सरकारने कुडतरीत येऊन पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या बांधांचा अभ्यास करून त्याच प्रकारचे बांध राज्यात बांधण्याचे धोरण लागू करण्याची वेळ आली आहे.

मंगेश उसगावकर, पारंपरिक पाळणी, करमळी

अगोदर आम्ही चिखल, तण यांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने बांध बांधायचो. आता आधुनिक पद्धतीने माती आणि काँक्रिट वापरून बांधलेले बांध कोसळतात; कारण माती नदीच्या पाण्याचा दाब सहन करून शकत नाही. चिखल आणि तण यांचे मिश्रण अतूट असल्याने बांध कित्येक वर्ष उभे राहिले. ही प्रक्रिया सरकारने पुन्हा वापरल्यास बांध पूर्वीप्रमाणे टिकून राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT