"आम्ही शांततेचे समर्थन करतो. युद्ध हा समस्या सोडवण्याचा सभ्य मार्ग नाही असं आम्हाला वाटतं... पण शांततेचा पुरस्कार म्हणजे आक्रमकता आणि हिंसाचाराला बळी पडणे असा त्याचा अर्थ नाही. भारतावर हल्ला झाला तर आम्ही लढू आणि स्वतःचे रक्षण करण्यास कायम तयार राहू. शांतता हिंसाचार आणि आक्रमकतेला शरण जाण्याचा पर्याय बनली तर अशी शांतता लज्जास्पद आहे. शांततेचा उगम शक्तीतून निर्माण झाला पाहिजे."
हे शब्द आहेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे. गोवा पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाल्यानंतर नेहरुंनी २२ मे १९६३ रोजी पणजीतून समस्त गोमंतकीय आणि जगाला संबोधित केले होते. या भाषणात त्यांनी शांतता, युद्ध आणि पाकिस्तान व चीन बाबत वक्तव्य केले होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षानंतर नेहरुंनी गोव्यातील केलेल्या या भाषणाची प्रकर्षाने आठवण होत आहे. या भाषणात नेहरुंनी पाकिस्तान आणि चीनला देखील निर्वाणीचा इशारा दिला होता.
"चीन असो वा पाकिस्तान, मैत्रीपूर्ण संभाषणातून ते आपल्याकडून भरपूर काही मिळवू शकतात. पण जर प्रश्न धमक्यांचा असेल तर आम्ही त्याचा शेवटपर्यंत त्यांचा प्रतिकार करू," असे पंडित नेहरुंनी यावेळी भाषणातून ठणकावून सांगितले होते.
गोवा जवळपास चार शतके पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीखाली होता. भारतानंतर तब्बल १४ वर्षे गोव्याला स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागला. नेहरु पंतप्रधान असताना भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय राबवत १९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्याला पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त केले.
गोव्याबाबत बोलताना पंडित जवाहरलाल नेहरुंनी गोव्याची असलेली वेगळी ओळख याबाबत भाषणात उल्लेख केला होता.
"गोव्याची एक वेगळी ओळख आहे असं मला बऱ्याच काळापासून वाटत आलंय आणि ती ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केल्यास ते चुकीचे ठरेल. कदाचित हळूहळू वेळ आणि इतर घटक बदल घडवून आणतील, परंतु गोव्याच्या ओळखीला बाधा ठरणारे बदल करणे सरकारचे काम नाही.... गोवा भारताच्या चौकटीत आपल्या मनाप्रमाणे विकास करू शकतो आणि अशा प्रकारे भारताच्या समृद्धतेत भर घालू शकतो,' असे नेहरु म्हणाले होते.
गोवा अथवा भारताची उभारणी आणि महान वारसा जपणे या कामाशिवाय तुमची ऊर्जा इतर कोणत्याही गोष्टीकडे वळवणे चुकीचे ठरेल, असेही नेहरुंनी भाषणात नमूद केले.
पंडित जवाहरलाल नेहरुंचा गोव्याला सत्याग्रह आणि शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्याचा आग्रह होता. गोव्यात सैन्य कारवाई करणार नाही, असे त्यांनी १९५५ साली केलेल्या भाषणात म्हटले होते. अखेर त्यांच्यात कार्यकळात गोवा मुक्तीसाठी १९६१ साली ऑपरेशन विजय राबविण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.