Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: कोण म्हणतो मोतीडोंगर बिनकामाचा?

Khari Kujbuj Political Satire: कधी कधी योगायोग मोठे मजेशीर असतात. विरोधी पक्षनेते व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या व्यावसायिक इमारतीतील दुकाने भाड्याने घेतली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

कोण म्हणतो मोतीडोंगर बिनकामाचा?

मडगावचा मोतीडोंगर म्हटला की आमदार दिगंबर कामत यांचा बालेकिल्ला असे लगेच म्हटले जाते. हा परिसर केवळ दंगामस्ती, चोऱ्या व अशा अनेक वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध असला तरी गेल्या तीस वर्षांपासून ते याच लोकांच्या पाठिंब्यावर आमदार म्हणून निवडून येत आहेत. जो आपल्याला सोबत करतो त्यांच्या पाठीशी आपण सदैव असतो असे दिगंबरबाब सांगतात. त्यांनी या परिसरात सुधारणा केली आहे. आता पार्किंगसाठी जागा व रस्त्यांची सुधारणा ते करणार आहेत. पोलिस चौकीचे उद्‍घाटन तर झाले. त्यामुळे तरी परिसरात शांतता नांदेल अशी आशा ते व्यक्त करतात. त्यांनी तेथे एक शाळाही उघडली. या शाळेत शिकलेले अकबर नामक विद्यार्थी आता चौगुले महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून नोकरीस लागल्याचे व त्याचा आपल्याला अभिमान वाटतो असे कामतबाब सांगतात. त्यामुळे यापुढे आता मोतीडोंगर परिसर सुधारेल अशी आशा लोक बाळगून आहेत. ∙∙∙

ती दुकाने युरींच्या कर्मचाऱ्यांना?

कधी कधी योगायोग मोठे मजेशीर असतात. विरोधी पक्षनेते व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या व्यावसायिक इमारतीतील दुकाने भाड्याने घेतली आहेत. ही दुकाने आमदारांनी आपल्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना दिली असा आरोप होऊ लागला आहे, परंतु त्या दुकानांचा जाहीर लिलाव झाला होता व ज्यांची बोली मोठी होती त्यांना दुकाने मिळाली. त्यात युरींचा किंवा पालिकेचा काहीही हात नाही. युरींच्या कर्मचाऱ्यांना दुकाने मिळाली हा केवळ योगायोग आहे की ‘दाल मे कुछ काला है’ हे पालिकेलाच माहीत. ∙∙∙

नागरिकांनी घेतला गव्यांचा धसका

बेतोड्यात भर लोकवस्तीत एका महिलेला शिंगे खुपसून गव्याने ठार केल्याने लोक भयभीत झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी गव्यांचा मुक्त संचार असून या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात तर गवे मुक्तपणे फिरत असून सुर्ल - पाळी भागात गवे लोकांना दिसले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांत आता घबराट पसरली आहे. एरव्ही गवे म्हटल्यावर लोक फारसे मनावर घेत नव्हते, पण एका महिलेचा प्राण गव्याने घेतल्याने एकट्यादुकट्याची जर गव्या रेड्याशी गाठ पडली तर करायचे काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी लोकांनी वन खात्याकडे केली आहे. त्यामुळे वन खात्याकडे आता मोठी जबाबदारी आली आहे आणि या खात्याकडून त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून होत आहे. ∙∙∙

साहेबांनो, कुत्र्यांना आवरा!

‘कुणाच्या म्हशी अन् कोण काढतो उठाबशी’ अशी एक म्हण आहे. काही लोकांचे श्वानप्रेम इतरांच्या जिवावर बेतत आहे. आपल्या देशात कुत्र्याच्या चाव्यामुळे अनेकांना जीव गमावावा लागतो. परवा वास्को येथे एका घरात वीज बिल देण्यासाठी गेलेल्या वीज खात्याच्या कर्मचाऱ्यावर त्या घरातील कुत्र्याने हल्ला केला. हल्ला एवढा भयानक होता, की बिचाऱ्या वीज कर्मचाऱ्याचा त्यात बळी गेला. अशीच घटना चार दिवसांपूर्वी फातोर्डा येथे घडली. वीज बिल देण्यासाठी गेलेल्या वीज खात्याच्या कर्मचाऱ्यावर एका डॉक्टराच्या कुत्र्याने हल्ला केला. वीज खात्याचे कर्मचारी आता एवढे घाबरले आहेत की ज्या घरात कुत्रा आहे तिथे जायचेच नाही असा त्यांनी म्हणे निर्णय घेतला आहे. घरमालकांचे श्वानप्रेम वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या जिवावर उठले आहे असे आता हे कर्मचारी म्हणायला लागले आहेत. आता सरकार काय निर्णय घेतात ते पाहुया. ∙∙∙

‘साबांखा’वरील बोजा कमी करा!

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यावरील (साबांखा) बोजा कमी करण्यासाठी गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाची (जीएसआयडीसी) स्थापना केली. त्यामुळे साबांखाकडे काही मोजकीच कामे राहिली, पण तीही कामे या खात्याला पेलवत नाहीत असे दिसते. जीएसआयडीसीची स्थापना ही मूळ नव्या इमारती, प्रकल्प उभारण्यासाठी झाली. परंतु कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम जीएसआयडीसीकडे न जाता साबांखाकडे आले काय आणि झालेली कामे आता वादामुळे गाजतात (कला अकादमी नूतनीकरण) काय. साबांखाकडे खऱ्या अर्थाने रस्त्याची कामेच असायला हवी, पण या खात्यावर रस्ते, मलनिस्सारण, इमारतींची दुरुस्ती, पाणीपुरवठा अशी कामे सोपवली आहेत. त्यासाठी साबांखाचे वेगवेगळे विभागही झाले आहेत. परंतु जलस्रोत खात्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद असते, तर त्यांच्याकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी का देऊ नये, हा प्रश्न आहे. काँग्रेसचे आमदार कार्लोस फेरेरा आता पाणीपुरवठ्याची जबाबदारी जलस्रोत खात्याकडे द्यावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहेत, पाहुया आता या पत्राची किती गांभीर्याने सरकार दखल घेतेय ते. ∙∙∙

यावर ‘कुजबुज’ येईल, बरे का!

ज्‍येष्‍ठ पत्रकार गुरुदास सावळ यांचा पणजीत सत्‍कार झाला. एकेकाळी गाजलेल्‍या ‘चक्रव्‍यूह’ या त्‍यांच्‍या सदराचे लोकाग्रहास्‍तव पुस्‍तक छापण्‍यात आले, त्‍याचे प्रकाशनही झाले. या कार्यक्रमात सुरेश वाळवे, ॲड. रमाकांत खलप असल्‍याने जुन्‍या आठवणी आणि काही राजकीय चिमटे काढले जाणे साहजिक होते. खलपांनी गोव्‍यातील जमिनी वाचविण्‍याचे आवाहन करून पोर्तुगीजकालीन कायद्यांनी राखलेल्‍या गोव्‍याच्‍या अस्‍तित्‍वावर प्रकाश टाकला. यथोचित शाब्‍दिक फटकेबाजी सुरू असताना मान्‍यवरांना ‘कुजबुज’ सदराचीही आठवण होत होती, हे विशेष. प्रमुख वक्ते सुरेश वाळवे यांना लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी आपले नाव कधीकाळी घेतले जात होते, याची याद झाली. ‘अण्णा झांट्ये, अमृत कासार व मी अशी तीन नावे अग्रक्रमाने पुढे येत होती. त्यात माझे नाव पाचांत तिसऱ्या स्थानावर होते; पण माझा नंबर लागला नाही! नाहीतर ॲड. खलप माझे प्रतिस्पर्धी ठरले असते’, असे उद्‍गारताना वाळवे यांनी ‘कुजबुज’चा उल्‍लेख केला. असेच काहीसे ॲड. रमाकांत खलपांचे! ते बोलायला उभे राहिले. हसत हसत गमतीने सुरवातच अशी केली की, श्रीपाद नाईक यांच्याबद्दल माझ्या मनात असूया आहे. त्यावेळी श्रीपाद नाईक वाळवे यांच्याशी काहीतरी बोलत होते. तेव्हा खलप पुन्हा म्हणाले, श्रीपाद भाऊ ऐकताय ना? तेव्हा भाऊ पण दिलखुलास हसले. त्यावर खलपभाई उद्‍गारले, उद्या यावर ‘कुजबुज’ येईल बरे का! ∙∙∙

काय..? ‘सुपर सीएम आहे’?

‘बॉस इज ऑल्वेज राईट’ असे म्हणतात. मात्र, काहीवेळा बॉसचेही ऐकले जात नाही असा अनुभव भाजपा समर्थकांना यायला लागला आहे. कार्यकर्ते व आमदार जेव्हा आपली कामे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातात, तेव्हा मुख्यमंत्री काम करा असा शेरा मारून फाईल व अर्ज संबंधित खात्याकडे पाठवितात. मात्र, मुख्यमंत्र्यांचा शेरा असूनही कामे होत नाहीत असा अनुभव आता कार्यकर्त्यांना यायला लागला आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश धुडकावून लावण्याचे साहस खाते प्रमुखांना कसे होते? या आदेशाचे पालन न करण्याचा आदेश देणारा ‘सुपर सीएम’ आहे का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. ∙∙∙

अपात्रता याचिका

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आठ आमदारांविरुद्ध गिरीश चोडणकरांबरोबर ज्या डॉम्निक नोरोन्हो यांची अपात्रतेची याचिका दाखल आहे, त्या याचिकांवर आता सासष्टीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. याचिकाकर्ते नोरोन्हो यांची बहीण मडगावच्या नगरसेविका आहे आणि त्यांना निवडून आणण्यात दिगंबर कामत यांचा मोठा वाटा आहे. कामत यांचा भाजपप्रवेश होण्यापूर्वी नोरोन्हा हे त्यावेळी म्हणे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत असे सर्वांना वाटत होते, परंतु अंदर की बात म्हणजे कामत यांचा प्रवेश झाल्यानंतर नोरोन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय नसल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यांनी जी याचिका दाखल केली, त्यामागे वेगळीच खेळी असल्याचे आता त्यांचे निकटवर्तीय बोलू लागले आहेत. चोडणकरांच्या याचिकेवरील सुनावणीला वेळ लागावा, ती अधिकाधिक लांबणीवर पडावी, यासाठी तर ही पडद्यामागील खेळी नसावी ना, असे सासष्टीकरांना वाटत आहे. चोडणकरांना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत का धाव घ्यावी लागली, यामागील डावपेचाची पूर्ण कल्पना त्यांना आहे. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीविषयी सभापतींना आदेश दिल्यामुळे चोडणकरांच्या याचिकेवरील सुनावणीला गती येईल, एवढीच आशा.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

MI vs DC: षटकारांच्या दुनियेत रोहित शर्माचा एकतर्फी दरारा! विराट-धोनीच्या 'एलिट' क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री; दिल्लीत रचला इतिहास

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

SCROLL FOR NEXT